शिर्डी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केवळ महाराष्ट्रातील आणि भारतातील नव्हे तर जगभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेली शिर्डी येथील प्रसिद्ध श्रीसाईबाबा समाधी मंदिराची वास्तू सध्या वादाच्या भोवऱ्यास सापडली आहे, कारण साईबाबांच्या समाधी मंदिराच्या छतावर वायुविजन यंत्रणा (व्हेन्टिलेशन) बसवली आहे. यामुळे सध्या त्याच्या वजनाने या जुन्या व ऐतिहासिक वास्तूलाच धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या संदर्भात तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत असून त्या संदर्भात लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याचे विश्वस्त मंडळाकडून सांगण्यात आले.
संपूर्ण राज्यात साईबाबांची अनेक मंदिरे आहेत. परंतु शिर्डीतील साईबाबांचे मंदिर सर्व मंदिरांपेक्षा वेगळे आहे, कारण साई बाबा शिर्डीच्या साईबाबांचे मंदिर होण्यापूर्वी या छोट्या गावात राहत होते. शिर्डीचे साई बाबा सामान्य माणसाप्रमाणेच वास्तव्यास असत.
साई बाबा एक महान अध्यात्मिक गुरु होते आणि त्यांच्याकडे बरीच अद्भुत शक्ती होती. साई बाबा भगवंताचा अवतार असल्याचीही धारणा आहे.
साधारणतः १९ व्या शतकाच्या उत्तरार्धातील संत श्री साईबाबा यांचे घर म्हणून शिर्डी प्रख्यात आहेत. शिर्डी येथे स्थित श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट ही सर्वात श्रीमंत मंदिर, संस्था आहे. नागपूरचे एक साईभक्त गोपाळराव बुटी यांनी सन १९१४ ते १९१८ या कालावधीत या वास्तूचे निर्माण केले. बुटीवाडा किंवा समाधी मंदिर म्हणून प्रसिद्ध असलेली ही वास्तू जगभरातील भाविकांच्या दृष्टीने पवित्र मानली जाते. तसेच या समाधी मंदिराच्या आत हवा खेळती राहावी यासाठी छतावर वायुविजन यंत्रणेचे युनिट ठेवले आहे. रोज ते सुरू करताना मोठा हादरा जाणवत असतो , तसेच तो अन्य ठिकाणीही जाणवत असल्याने या वास्तूच्या दृष्टीने हे धोकादायक आहे. याच्यालगतच असलेल्या साईंच्या प्राचीन द्वारकामाई मंदिरात भाविकांचा वावर असतो. वजन व हादऱ्याने इजा पोहोचू नये म्हणून भाविकांना द्वारकामाईत बाबांच्या फोटोपर्यंत सुद्धा जाऊ दिले जात नाही. दुसरीकडे समाधी मंदिरावर मात्र बोजा ठेवला आहे. तो तातडीने हटवून तेथे वेगळी व्यवस्था निर्माण करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
समाधी मंदिरावरील बोजाची गंभीर बाब नुकतीच निदर्शनास आली आहे. वास्तविक या साईंचा महिमा हा भारतापुरता मर्यादित नाही. देशात तिरुपती देवस्थाननंतर शिर्डी दुसऱ्या स्थानावर आहे. साईबाबा यांच्या च्या दरबारी सध्या सुमारे दोन हजार कोटींच्या ठेवी, सहा हजार कर्मचारी, दरवर्षी साडेतीनशे कोटींचे दान, सहाशे कोटींची वार्षिक उलाढाल, अशी भरभक्कम गंगाजळी आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटीच दरवर्षी सुमारे पावणेदोनशे कोटी रुपये खर्च होतात. तसेच साईंच्या दर्शनासाठी येणारे भाविक रुपये-पैसे, सोने-चांदी, इतर मौल्यवान वस्तूंचे दान करतात. त्यामुळे मंदिरात हवा खेळती राहण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यासाठी काही कठीण नाही, कारण यासाठी कोणतीही आर्थिक अडचण येणार नाही.
देवस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी आयएएस अधिकारी आहे. शिर्डीत दरवर्षाला दोन कोटींपेक्षा अधिक भाविक येतात. मात्र, शिर्डी देवस्थानचा अद्याप श्री तिरुपती बालाजी देवस्थान सारखा म्हणावा तसा विकास झालेला नाही. संस्थानांच्या नियुक्त्यांना मुंबई विश्वस्त अधिनियम लागू होत नाही. येथे थेट सरकारच विश्वस्त निवडते. परंतु विश्वस्त मंडळाच्या निवडीवरून नेहमीच येथे वादविवाद होत असतात. तसेच महिनाभरापूर्वी साईबाबा मंदिरात हार फुले आणि प्रसाद देऊ नये, असाही आदेश काढण्यात आला होता. यावरून परिसरातील शेतकरी, भक्त आणि विश्वस्त मंडळ पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा वाद निर्माण झाला होता, काही असले तरी भाविकांना दर्शनाची सुविधा व्यवस्थित व्हावी, कोणती अडचण निर्माण होऊ नये, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
Shirdi Sai Baba Temple again in Discussion What’s Happen
Ventilation System Dangerous Controversy Oppose