मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात सत्ता स्थापन झाल्यानंतरही एकनाथ शिंदे गटामध्ये मोठी धूसफूस सुरू असल्याचे वारंवार समोर येत आहे. दोन दिवसापूर्वीच एका बैठकीत शिंदे मंत्रिमंडळातील विद्यमान मंत्री अब्दुल सत्तार यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार दिलीप लांडे यांनी देखील अशाच प्रकारे उघड नाराजी व्यक्त केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली पार पडते. यावेळी जिल्ह्यातील विविध विकास कामांचे नियोजन करताना झालेल्या कामांचा आढावा घेण्यात येतो. यावेळी जिल्ह्यातील संबंधित जिल्ह्यातील खासदार तसेच सर्व आमदार उपस्थित राहतात, असे दिसून येते. परंतु आपल्या मतदारसंघात विकास कामे व्हावीत यासाठी काही आमदार सातत्याने प्रश्न मांडत असतात. मात्र सध्या ज्याप्रमाणे महाविकास आघाडीच्या काळात आपल्या मतदारसंघात कामे होत नव्हती, त्याचप्रमाणे आता सत्तांतर होऊनही आपल्या मतदारसंघात कामे होत नसल्याचा आरोप सत्ताधारी पक्षाच्या आमदारांकडून वारंवार होत आहे. तसेच या संदर्भात ते उघडपणे नाराजी व्यक्त करत आहेत, असे दिसून येते.
राज्यात सत्ताबदलानंतर पहिल्यांदाच मुंबई उपनगरात पालकमंत्री मंगलप्रभात लोढांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. जिल्हा नियोजन समिती बैठकीला सर्व पक्षीय आमदार व खासदार उपस्थित होते. यावेळी चांदीवलीचे आमदार दिलीप लांडेंनी निधीवाटपावरुन नाराजी व्यक्त केली करीत केवळ चहा – नाश्ता देऊन आमदारांचे तोंड दाबू नका, विकास कामे कसे होतील याकडे लक्ष द्या, असे प्रशासनांना सुनावल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.
आमदार दिलीप लांडे यांची ठाकरे कुटुंब आणि मातोश्रीच्या जवळचे आमदार म्हणून ओळख होती. शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे त्यांना लांडे मामा असे म्हणत, शिंदे गटात सामील झाल्यावर आदित्य ठाकरे यांनी त्यांना मामा तुमच्याकडून अशी अपेक्षा नव्हती असे देखील सुनावले होते. पण एकनाथ शिंदे यांच्या बंडावेळी दिलीप लांडे यांनी गुवाहाटीत धाव घेत शिंदे गटात सामील झाले होते.
आता लांडे मामा यांनी राज्यात सरकार बदलले, पण यंत्रणा सुधारली नाही, अशी टीका त्यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांना प्रशासकीय अधिकारी खोटी माहिती देत असल्याचा आरोपही लांडें यांनी केला आहे.
लांडे म्हणाले की, सरकार बदलले तरी प्रशासन मात्र, तसेच आहे. मुख्यमंत्र्यांपर्यंत ते योग्य माहिती पोहचू देत नाहीत, असा आरोप त्यांनी केला. राज्य सरकारचे असेल महापालिकेचे असेल, सूचना देऊनही कामे होत नाहीत. अधिकाऱ्यांना सांगुनही कामे होत नसतील तर या जिल्हा नियोजन आयोगाच्या बैठकीचा उपयोग काय, असा प्रश्न लांडे यांनी उपस्थित केला.
इतकेच नव्हे तर कामे होत नसतील तर बैठकीला येवून फक्त चाहा, नाष्ता करायचा का?, असेही ते म्हणाले. सर्व आमदारांना नाष्ता देऊन तोंड बंद करायचे. असे असेल तर बैठकीला येण्याचे काम माझ्याकडून होणार नाही, असा संताप लांडे यांनी व्यक्त केला. त्यामुळे सत्ता बदलली तरी आता शिंदे गटाच्या आमदारांची कामे होत नाहीत का ? असा, सवालही नागरिकांकडून विचारला जात आहे. मग सर्वसामान्य जनतेची तरी कामे कशी होतील असेही म्हटले जात आहे.
Shinde Group MLA disfavor Planning Meeting
Politics