निलेश गौतम
सटाणा – सध्या बागलाण मधील शेतकऱ्यांना मजुर टंचाईसह सर्वात मोठी समस्या उद्भवली आहे ती विजेची ऐन रब्बी हंगामाच्या सुरुवातीलाच वीज वितरणचा विजेचा लपंडाव सुरू झाल्याने तालुक्यातील अनेक गावातील शेतकरी विजेच्या समस्याने त्रस्त होऊन मेटाकूटीस आले आहेत. या गंभीर प्रश्नी शेतकऱ्यांनी आज थेट तहसील कार्यालय गाठत वीज वितरणच्या अधिकाऱ्याच्या विरोधात थेट तक्रारींचा पाऊस सुरू केला. अवकाळीने नुकसान झाले तरी तहसीलदार कार्यालाय आणि वीज समस्याने नुकसान झाले तरी तहसील कार्यालय गाठण्याची वेळ आम्हाला येते असे सांगत सुराणे येथील नितीन देवरे या उच्चशिक्षित शेतकऱ्याने आपली कांदा लागवडीची व्यथा थेट तहसीलदार जितेंद्र इंगळे यांच्यासमोर मांडत आपल्या अश्रूंना वाट मोकळी केली. यावेळी सुराणेसह कंधाने परिसरातील असंख्य शेतकरीही तहसीलदारांच्या दालनात उभे असताना तहसीलदार ही या शेतकऱ्याची व्यथा एकूण भावुक झाले.
शेतीचा ग्रीन बेल्ट म्हणून ओळख असलेल्या बागलांणमध्ये सध्या वीज वितरणच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी निवेदन देऊन मागणी करून ही गेली तीन वर्षे ऐन हंगामात होणारा विजेचा लपंडाव व त्याची समस्या संबंधित अधिकारी निराकरण करू शकत नसल्याने अशा अधिकाऱ्यांची या तालुक्यातून तडकाफडकी बदली करावी यांच्यावर प्रशासनाने कार्यवाही करत यांना घरी पाठवावे अशीच मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांनी या प्रश्नी वीज वितरणचे कार्यकारी अभियंता सतीश बोंडे यांना तात्काळ फोन करीत संबंधित शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या आहेत.
सुराने, कर्हे व कंधाने परिसरातील शेतकऱ्यानी जोपर्यंत विजेची समस्या दूर होत नाही तोपर्यंत आम्ही विजीवीतरणच्या सटाणा येथील उपविभागीय कार्यालयात स्थान मांडून बसू प्रसंगी याच कार्यालयात झोपून राहू असा निर्धार केल्याने स्वतः तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील विजवितरणच्या कार्यकारी अभियंता यांच्या दालनात चर्चा करण्यासाठी जाण्यास तयार झाल्याने शेतकऱ्यांनी आम्हाला तहसीलदार हेच एकमेव अशेचा किरण असल्याचे सांगत आमचा विजेचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याची मागणी केली .
यावेळी सुराने येथील बहुसंख्य शेतकऱ्यांसह कंधाने येथील प्रगतशील शेतकरी वसाकाचे माजी संचालक अमृता बिरारी, बाजार समितीचे संचालक संजय बिरारी, राष्ट्रवादीचे युवा पदाधिकारी किरण पाटील,काकाजी बिरारी, शांताराम बिरारी, बाळू भागा बिरारी, रविकाका बिरारी, मनोहर बिरारी, गणेश बिरारी, बाजीराव बिरारी, वसंत शिरसाठ, राजेंद्र बिरारी जगतसिंग ठोके ,सुधाकर आहिरे हिरामण इंगळे, रमेश देवरे ,आबा लोणकर ,गोरख लोणकर ,दिनेश निकम ,नरेंद्र सोनवणे, भाऊसाहेब अहिरे, संदीप ठोके ,मंगेश ठोके ,प्रदीप कानडे, नितीन देवरे, रवींद्र देवरे सह बहुसंख्य शेतकऱ्यांनी यावेळी तहसील कार्यालयात निवेदन देऊन आपल्या समस्या सोडविण्याची तहसीलदारांना विनंती केली. यावेळी किसान मोर्च्याचे प्रदेश अध्यक्ष शेतकरी मित्र बिंदू शर्मा हेही उपस्थित होते. येत्या चार दिवसात विजेचा प्रश्न सोडविणार असल्याचे लेखी पत्र विजवितरणचे कार्यकारी अभियंता सतीश बोंडे यांनी तहसीलदार कार्यालयाला दिले असल्याची माहिती शर्मा यांनी दिली आहे..