रविंद्र धारणे, त्र्यंबकेश्वर
भागवत धर्माचे आद्य प्रवर्तक व लाखो वारकर्यांचे श्रध्दास्थान असणार्या येथील संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची यात्रा १७ ते १९ जानेवारी दरम्यान संपन्न होत असुन दि. १८ जानेवारी अर्थात षटतिला एकादशी यात्रेचा मुख्य दिवस आहे. यात्रेसाठी भाविकांचा ओघ वाढला असुन भाविकांच्या स्वागतासाठी त्र्यंबक नगरी सज्ज झाली आहे.
गेली दोन वर्षे कोरोनाच्या सावटाखाली यात्रा संपन्न झाल्यामुळे यावर्षी यात्रेसाठी मोठी गर्दि होईल असा प्रशासनाचा अंदाज आहे. पाचशेहुन अधिक पायी दिंड्यांसह तिन लाख भाविक यात्रेसाठी हजेरी लावतील असा अंदाज आहे. बाहेरगावाहुन येणारे व्यावसायिकंनी आपापली दुकाने लावण्याचे काम सुरु केले आहे. त्याचबरोबर मनोरंजनाची साधनेही नगरीत दाखल होत आहे. भाविकांना मुलभुत सोयीसुविधा देण्यासाठी त्र्यंबक नगरपालीका सज्ज झाली असल्याची माहिती मुख्याधिकारी तथा प्रशासक संजय जाधव यांनी दिली आहे. पोलीस बंदोबस्ताचे नियोजन पुर्ण झाले असुन मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात येणार असल्याची माहिती पो.नि. संदीप रणदिवे यांनी दिली. पोलीस उपविभागीय अधिकारी कविता फडतरे, पो.नि. संदीप रणदिवे व सहकार्यांनी श्रीनिवृत्तीनाथ मंदिर परिसराची पाहणी करुन बंदोबस्ताचे नियोजन केले आहे.
सध्या मंदिराच्या जिर्णोधाराचे काम सुरू आहे. महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाच्या प्रसाद योजनेअंतर्गत मंदिर परिसरात कामे सुरू आहेत. यात्रा काळात राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी त्र्यंबक नगरीत दाखल होतात. त्यांची कुठलीही गैरसोय होऊ नये, यासाठी देवस्थानच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत. मंदिर परिसरातील मुख्य सभागृह सभा मंडप पाडण्यात आले असल्याने या ठिकाणी कृत्रिम सभामंडप तयार करण्यात आला आहे. त्याचबरोबर मुख्य सभामंडपाच्या बाजूलाच कृत्रिम दर्शन बारीची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच वारकऱ्यांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी दर्शन बारी वरही मंडप उभारण्यात आला आहे.
जम्बो व्यवस्थापन उपसमिती
पौषवारीच्या व्यवस्थापनाकरता यात्रेच्या तोंडावर विश्वस्त मंडळाच्या वतीने चाळीस सदस्यांची जम्बो व्यवस्थापन समिती तयार करुन त्र्यंबककरांना खुश करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अवघ्या दहा दिवसांपुर्वी संत निवृत्तीनाथ संस्थानचे बोधचिन्ह व सोशल मिडीया माध्यमांचा प्रकाशन सोहळा येथे न ठेवता नाशिकच्या कालीदास कलामंदिरात ठेवण्यात आला होता, त्यामुळे स्थानिक नागरीकांमध्ये नाराजीचा सुर होता. तसेच या कार्यक्रमासाठी नगराध्यक्ष व नगरसेवकांनाही डावलण्यात आल्याने त्र्यंबकवासियांनी तिव्र संताप व्यक्त केला. आजपावेतो यात्रेसाठी कधीही उपसमिती तयार करण्यात आली नव्हती व मोठमोठे कार्यक्रमात नागरीकांनी सहकार्य करुन कार्यक्रम यशस्वी पार पाडले.
वास्तविक पाहता विश्वस्त मंडळात पदसिध्द विश्वस्त पुजारी गोसावी बंधु वगळता सर्व विश्वस्त तालुक्याच्या बाहेरचे असल्याने उपसमिती तयार केली असल्याचे सांगितले जाते. यात्रा व्यवस्थापना करीता उपसमिती दहा पंधरा दिवस आधीच तयार केली असती तर नियोजन सोपे झाले असते, यात्रेच्या तोंडावर अवघे तीन दिवस आधी नियुक्ती पत्रे दिली गेली, दोन दिवसात उपसमिती काय काम करणार? यात्रेची सर्व तयारी पुर्ण झाल्यावर उपसमिती काय करणार? असा सवाल विचारला जात आहे. त्र्यंबककरांची नाराजी दुर करण्यासाठीच घाईघाईत यात्रा व्यवस्थापन उपसमिती तयार केली असल्याची गावात चर्चा आहे.
Sant Nivruttinath Yatra Trimbakeshwar Preparation Planning