सोमवार, मे 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक आणि या परिसराने मला घडविलेले, मी स्वतः लेखक नाही पण वाचक जरूर; स्वागताध्यक्ष छगन भुजबळ

by India Darpan
डिसेंबर 3, 2021 | 8:22 pm
in इतर
0
IMG 20211203 WA0267

नाशिक – मी लेखक नाही मात्र वाचक जरूर आहे. लेखकाला लेखन स्वातंत्र्य असलेच पाहिजे या मताचा मी आहे. त्याच्यावर कुणी निर्बंध लादणार असेल तर त्याला पहिला विरोध करणारा मी असेन. लोकहितवादी मंडळ अयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी सांगितले. ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुसुमाग्रज नगरी मेट भुजबळ नॉलेज सिटी नाशिक येथे उदघाटन कार्यक्रम पार पडला. त्यावेळी भुजबळ बोलत होते.

यावेळी मराठी भाषा विभागाचे मंत्री सुभाष देसाई,कृषी मंत्री दादाजी भुसे, प्रमुख पाहुणे जावेद अख्तर, अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील,उदघाटक विश्वास पाटील,डॉ.दादा गोऱ्हे,रामचंद्र साळुंखे, खासदार श्रीनिवास पाटील,शुभांगीणीराजे गायकवाड, ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोत्तापल्ले, सदानंद मोरे, उत्तम कांबळे, लक्ष्मीकांत देशमुख,श्रीपाल सबनीस,हेमंत टकले,समीर भुजबळ,पंकज भुजबळ,जयप्रकाश जातेगावकर,विश्वास ठाकूर, प्रा.डॉ.शंकर बोऱ्हाडे, सुभाष पाटील, मिलिंद कुलकर्णी,प्राचार्य प्रशांत पाटील, संजय करंजकर, दिलीप साळवेकर, स्वानंद बेदरकर यांच्यासह पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना स्वागताध्यक्ष छगन भुजबळ म्हणाले की, महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात आज मी ज्येष्ठ मंत्री म्हणून सहभागी असलो तरी नाशिक आणि या परिसराने मला घडविलेले आहे. मी स्वतः लेखक नाही पण वाचक जरूर आहे. तमाम मराठी वाचकांचा प्रतिनिधी म्हणून मी आपले स्वागत करण्यासाठी उभा आहे. ग्रंथकार सभेची स्थापना आपले निफाडचे न्या. महादेव गोविंद रानडे आणि लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी केली होती. न्यायमूर्ती रानडे आणि लोकहितवादी हे दोघेही नाशिकमध्ये काही काळ न्यायदानाचे काम करीत होते. ग्रंथकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी स्थापन झालेल्या ग्रंथकार सभेचे रूपांतर आज साहित्य संमेलनात झाले आहे. महाराष्ट्राचा हा महाउत्सव अखिल भारतीय पातळीवर साजरा केला जात असतो. आपण या घटनेचे साक्षीदार आहोत याचा मला आनंद वाटतो.

पुढे बोलताना ते म्हणाले की, नाशिकमध्ये १९४२ मध्ये आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या अध्यक्षतेखाली पहिले संमेलन संपन्न झाले. ते संमेलन चित्रमंदिर सारख्या थिएटरमध्ये नाट्य क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींनी भरविले होते. त्याचे स्वागताध्यक्ष वामनराव पुरोहित हे नटश्रेष्ठ शिक्षक होते. पुढील काळात माझे सहकारी डॉ. वसंतराव पवार यांनी २००५ मध्ये ७८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक नगरीत घेतले. त्याचे अध्यक्ष प्रसिद्ध दलित लेखक प्रा. केशव मेश्राम होते. त्या संमेलनाच्या आयोजनात कार्याध्यक्ष म्हणून विनायकदादा पाटील यांचा सहभाग होता. हे तिघेही आज आपल्यात नाहीत याचे दु:ख वाटते. पहिल्या दोन संमेलनात सहा दशकाचे अंतर पडलेले होते. त्यानंतर अवघ्या पंधरा-सोळा वर्षात कुसुमाग्रज साहित्य नगरीत हे संमेलन होत आहे. लोकहितवादी मंडळ या संस्थेची स्थापना वि. वा. शिरवाडकर तथा आपल्या कुसुमाग्रजांनी सात दशकापूर्वी केली. लोकहितवादी मंडळ नाटक, संगीत या परफॉर्मिंग आर्ट विभागात काम करीत असते. मराठी नाटकाचा झेंडा दिल्लीपर्यंत नेणाऱ्या लोकहितवादी मंडळाने नाशिकच्या सांस्कृतिक क्षेत्रात आपला लौकिक निर्माण केला आहे. आकाराने लहान पण सांस्कृतिक क्षेत्रात महान असणाऱ्या लोकहितवादी मंडळाला साहित्य संमेलनाच्या आयोजनात प्रारंभी गोखले एज्युकेशन सोसायटीचे साह्य लाभले. मार्च महिन्यात कोरोना महामारीची दुसरी लाट आली आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला साहित्य महामंडळाने स्थगिती दिली. हे संमेलन कोरोनाची दुसरी लाट कमी होत असताना अतिशय मर्यादित वेळात पार पाडावे लागणार होते. अगदी काही आठवड्यांचा कालावधी आम्हाला मिळाला पण त्यातही आमच्या सहकाऱ्यांनी सर्व गोष्टी सुरळीत करून दाखवल्या कोरोनाचे संकट असतानाच आयोजनात पावसाने अडथळा आणला रोज माध्यमातून संमेलन कसे होणार यावर प्रश्न विचारले जात होते. मात्र मुख्य मंडपात एक थेंब पाणी येणार नाही सर्व कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडतील असा शब्द मी दिला होता. तो आज पूर्ण होताना दिसत आहे असे मत मांडले.

यावेळी सर्वांचे स्वागताध्यक्ष या नात्याने स्वागत करताना भुजबळ म्हणाले मुंबई एज्युकेशनल ट्रस्टच्या जागेमध्ये साहित्य संमेलन साजरे होत असल्याने आपल्या सारस्वतांची सेवा करण्याची संधी आम्हाला लाभल्यामुळे संस्थेचा अध्यक्ष या नात्याने मी ते आमचे भाग्य समजतो.अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने नाशिक पुन्हा एकदा साहित्यचर्चेच्या व माध्यमांच्या केंद्रस्थानी आले आहे. श्रीक्षेत्र नाशिक त्रंबकेश्वरला प्राचीन इतिहास आहे. नाशिकला दक्षिण भारताची काशी म्हणतात. ‘काशीस जावे : नित्य वदावे’ अशी एक उक्ती प्रचलित आहे. तशी ‘नाशकात जावे गोदास्नाने पुनीत व्हावे’ अशीही उक्ती प्रचलित आहे. पवित्र तीर्थक्षेत्र असणाऱ्या नाशिकला जनस्थान म्हटले जाते. अगस्ती ऋषींनी गोदाकाठी वस्ती केली म्हणून हे जनस्थान. वाल्मिकी रामायणात श्रीराम सीता लक्ष्मण यासह अगस्ती यांना भेटले, अशी एक कथा सांगितली जाते. अगस्तींनी श्रीरामांना पाच भव्य वटवृक्षांच्या परिसरात राहायचा आग्रह केला. तीच पंचवटी होय. पाच वृक्ष म्हणजे ज्ञानाच्या पाच शाखा. एक अभ्यासज्ञान, दोन व्यवहारज्ञान, तीन गुरुज्ञान, चार तुलनात्मक ज्ञान, पाच आत्मज्ञान. नाशिक हे नवशिखांवर म्हणजे नऊ टेकड्यांवर वसलेले गाव आहे. जुनी गढी, नवी गढी, कोकणी टेक, जोगी वाडा, म्हसरूळ टेक, महालक्ष्मी टेक, सोनार टेक, गणपती टेक, चित्रघंटा टेक अशा या जुन्या गढ्या नाशिकची ओळख सांगणाऱ्या आहेत. दक्षिणवाहिनी गंगा गोदावरी च्या काठावर वसलेले गाव अशी नाशिकची ओळख आहे. गोदावरीचा उगम ब्रह्मगिरीवर आहे. सातवाहन कालीन ताम्रपटात श्री क्षेत्र त्रंबकेश्वराला श्रीपूर म्हटले गेले. नाशिक क्षेत्रापासून तो राजमहेंद्री पर्यंतचा गोदावरीचा प्रवास रोमांचित करणार आहे. तिला अनेक नद्या मिळतात. त्यातून ती विस्तारत गेलेली दिसून येते.

पुढे आपल्या भाषणात ते म्हणतात नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो. कुंभमेळा म्हणजे आत्मज्ञानाच्या देवाण-घेवाणीचा आनंद सोहळा होय. या सोहळ्यासाठी जगभरातून लोक नाशिकमध्ये येत असतात. आपण सर्वजण आज साहित्याच्या कुंभ पर्वासाठी नाशिकमध्ये आले आहात. नाशिक जगाच्या नकाशावर कुंभमेळ्यामुळे आले. आज साहित्यिकांच्या ज्ञान पर्वामुळे निदान भारताच्या आणि तंत्र क्रातीमुळे जगाच्या नकाशावर दिसत असेल. नाशिक हे फक्त तीर्थक्षेत्र नाही तर इतिहासाने समृद्ध असे गाव आहे. नाशिक धर्मक्षेत्र, संस्कृत विद्याभ्यासाचे विद्यापीठ आणि महत्त्वाचे व्यापारी केंद्र होते. तसेच नाशिकने यादव काळ, बहामनी काळ, निजामशाही यांचा अनुभव घेतला आहे. निजामाच्या काळात दौलताबादच्या सुभ्यात नाशिक हे गुलशनाबाद नावाने झळकले होते. पुढे मोगल मराठ्यांचा संघर्ष पेटला. १६७० च्या सुमारास मोगलांविरुद्ध शिवाजी महाराजांनी आक्रमक धोरण पत्करले. त्यांनी बागलाण प्रदेशात मुसंडी मारली. साल्हेर मुल्हेरचे किल्ले जिंकले. सुरतेची दुसरी लूट करून येताना मुगल फौजांनी राजांना वणी दिंडोरीपाशी अडविले. यात शिवाजी राजांचा विजय झाला. हा लढा शृंगेरीचे रण म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे. नाशिकचे दिवंगत कादंबरीकार मुरलीधर खैरनार यांनी त्यावर ‘शोध’ नावाची कादंबरी अलीकडील काळात लिहिली आहे. मराठी कादंबरीत लक्षवेधी, रहस्य आणि थरारकथात्मक कादंबरी असा तिचा उल्लेख केला जातो. नाशिक परिसरात मुगल मराठ्यांच्या अनेक चकमकी झाल्या. त्यात मराठ्यांना विजय मिळत राहिला. पेशवेकाळात नाशिकमध्ये अनेक मंदिरे निर्माण झाली. सरदार रंगराव ओढेकर यांनी इसवीसन १८७२मध्ये काळाराम मंदिर बांधले. सरदार नारोशंकर यांनी गोदावरी काठावर १७४७ मध्ये महादेवाचे मंदिर बांधले. या मंदिरावर चार टन वजनाची आणि दोन मीटर घेराची प्रचंड घंटा बसविली. ती नारोशंकराची घंटा म्हणून प्रसिद्ध आहे. ही घंटा पोर्तुगिजांनी तयार केली होती. तिचा नाद चार किलोमीटरपर्यंत ऐकू येत असे.
आधुनिक भारताच्या इतिहासात १८५७ चे बंड प्रसिद्ध आहे. या बंडात नाशिकच्या ७०० भिल्ल बांधवांनी इंग्रजांविरुद्ध उठाव केला होता. ते बंड भागोजी नाईकांचे बंड म्हणून गाजले. ते बंड इंग्रजांविरुद्ध जसे होते तसे नव्या समाजरचनेसाठी होते. आदिवासींचा प्रश्न त्यातून पुढे आला. आदिवासी समाजाचे अस्तित्व या बंडातून अधोरेखित झालेले दिसून येते असे मत मांडले याच बरोबर नाशिक जिल्ह्याचा इतिहासच मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थितांसमोर मांडला.

नाशिक शहराची सनातन्यांचे नाशिक अशी ओळख असताना नाशिकची वाटचाल सामाजिक सुधारणा आणि क्रांतिकारकांचे गाव अशी झालेली दिसून येते. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अभिनव भारताची मुहूर्तमेढ येथे रचली. कवी गोविंदांनी ‘रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले?’ अशी कविता लिहून या क्रांतीकार्याला हातभार लावलेला दिसतो. म्हणून कवी गोविंदांना स्वातंत्र्यकवी संबोधले जाते. स्वातंत्र्य आंदोलनात नाशिकच्या विजयानंद नाट्यगृहात अनंत कान्हेरेने जिल्हाधिकारी जॅक्सनचा वध केला आणि या क्रांतिकारी चळवळीचे लोण देशभर पसरले. गोदागौरव लिहिणाऱ्या नाशिकच्या राजकवी चंद्रशेखर गोऱ्हे यांनी नाशिक हे तीर्थांचे माहेर, विद्येचे सागर, कर्तृत्त्वाचा सागर आहे असे नाशिकचे वर्णन करून ठेवले आहे. अशी माहिती भुजबळ यांनी दिली.

साहित्य संमेलनाच्या इतिहासात नाशिकचे नाव सुवर्णाक्षरात लिहिले जाईल अशी अजोड कामगिरी नाशिकने केली आहे. मुंबई येथे १९३८ मध्ये झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भूषविले होते आणि त्यांनी ‘लेखकांनी हातात लेखण्या न घेता बंदुका घ्या’ असा सल्ला तुम्हा मंडळींना दिला होता. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या चळवळीला अनुलक्षूण सावरकरांनी साहित्य मंचावरून आपले विचार मांडले हे लक्षात येते. पुढील काळात संमेलनाध्यक्षपदाचा मान तात्यासाहेब शिरवाडकर तथा कवी कुसुमाग्रज यांना लाभला. मराठी भाषेतले दुसरे ज्ञानपीठ त्यांना मिळाले आहे, हे मी आपणास सांगितले पाहिजे असे नाही. तात्यासाहेबांनी मडगाव,गोवा येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात मराठी भाषेची होणारी आबाळ सगळ्यांच्या लक्षात आणून दिली होती.

मराठी भाषेवर बोलताना स्वागताध्यक्ष छगन भुजबळ म्हणाले की मराठी ही भाषा अभिजात भाषा आहे. तिला २२५० वर्षांचा इतिहास असल्याचे शिलालेख, ताम्रपट, हस्तलिखित पोथ्यांचे शेकडो पुरावे आपल्या संगमनेरचे प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने त्यांच्या अहवालात दिलेले आहेत. हा अहवाल भारत सरकारने नेमलेल्या सर्व भाषातज्ज्ञांनी तपासला आणि एकमताने तो उचलून धरला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा ही त्यांची शिफारस गेली ७ वर्षे केंद्र सरकारकडे पडून आहे. आपले मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी समक्ष भेटून मा. पंतप्रधानांकडे तशी लेखी मागणी केलेली असूनही तिला मान्यता मिळालेली नाही. या संमेलनात आमच्या मराठी भाषा विभागाने याबाबतचे सुंदर सादरीकरण केले असून एक फिल्मही तयार केलेली आहे. मराठी ही श्रेष्ठ भाषा असून तिला ५२ बोलीभाषा आहेत. ती अमृतातेही पैजा जिंकणारी असल्याची गर्जना खुद्द ज्ञानोबारायांनीच केलेली आहे. “संस्कृतवाणी देवे केली मग प्राकृत मराठी काय चोरापासून झाली?” असा खडा सवाल संत एकनाथांनी विचारलेला आहे. मराठी भाषेतला पहिला ग्रंथ “गाथा सप्तशती” असल्याचे अभिजात समितीने सिद्ध केलेले आहे. मराठी भाषेची होणारी गळचेपी, हेळसांड आपण थांबविली पाहिजे. भाषा हे संवादाचे माध्यम असते तसेच भाषा ही संस्कृतीची निदर्शक असते. मराठी लावण्यवतीचे वर्णन करणारी लावणी अस्सल मराठी आहे आणि शूर मर्दाचा पोवाडा मराठीतच रचला आणि गायला जातो. आपण मराठी भाषा बोलतो म्हणजे आपण सांस्कृतिक आदानप्रदान करत असतो. कवी कुसुमाग्रज यांची मराठी भाषा आणि मराठी माणसाचे वर्णन करणारी अतिशय सुंदर कविता त्यांनी सादर केली

पुढे बोलताना भुजबळ म्हणाले की साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा सन्मान पुढील काळात वसंत कानेटकर यांना मिळाला. कानेटकरांची नाटके आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहेत. त्यांचे जन्मशताब्दी वर्ष नुकतेच होऊन गेले आहे. त्यांनी साहित्य साधनेत आपले संपूर्ण जीवन व्यतीत केले आणि ४०हून अधिक उत्तम नाटके रंगभूमीला दिली. त्यांच्या कामगिरीने मराठी नाट्यसृष्टीत चैतन्य निर्माण झाले, हे कुणीही नाकारू शकत नाही. पुढील काळात पत्रकार उत्तम कांबळे यांना साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्ष व अध्यक्षपदाचा सन्मान मिळाला. वृत्तपत्राचा संपादक, स्तंभलेखक आणि पुरोगामी लेखक म्हणून त्यांची कारकीर्द आपल्या सगळ्यांना परिचयाची आहे. ‘नाशिक तू एक सुंदर कविता’ लिहिणाऱ्या कांबळे यांनी आपल्या मुक्त कवितेतून नाशिकचे वैशिष्ट्य मांडले आहे. साहित्य संमेलन, वाचन संस्कृती हे नाशिकचे वैशिष्ट्य आहे.

नाशिक जिल्ह्यातील समाजपरिवर्तनाबाबत बोलताना भुजबळ म्हणाले की आधुनिक काळात नाशिक जिल्ह्यात अनेक सामाजिक लढे आणि समाजपरिवर्तनाच्या चळवळी झाल्याचे आपल्याला दिसून येते. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पद्मश्री दादासाहेब गायकवाड यांनी काळाराम मंदिर सत्याग्रह दीर्घकाळ चालविला. या सत्याग्रहाच्या कटू अनुभवानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी ‘मी हिंदू म्हणून जन्मलो, हिंदू म्हणून मरणार नाही’ अशी प्रतिज्ञा १९३५ मध्ये येवला येथे केली होती. त्या ठिकाणी मी स्वतः लक्ष घालून मुक्ती भूमी उभारली आहे. बौद्ध जनतेच्या दृष्टीने ही मुक्तीभूमी आस्थेचा विषय असून प्रतिवर्षी येथे भेट देणाऱ्या लोकांची संख्या वाढते आहे. डॉ. आंबेडकर नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी येऊन गेले आहेत. खुद्द नाशिकमध्ये त्यांनी १९५१ साली महात्मा फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण केलेले आहे. सिन्नरला त्यांनी जादाजुडीच्या सत्याग्रहासाठी येऊन लोकांना मार्गदर्शन केले होते. महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराजांच्या प्रेरणेने पुढील काळात दलित लेखकांनी लेखन केले. आपल्या वाणी आणि लेखणीने भिमशाहीर भिमराव कर्डक यांनी सामाजिक लढ्याला बळ दिलेले दिसून येईल.’ उद्धरली कोटी कुळे’ असे बाबासाहेबांच्या जन्माचे वर्णन करणारी कविता लिहिणारे वामनदादा कर्डक, ज्यांची जन्मशताब्दी वर्ष सध्या सुरू आहे, ‘सांगा आम्हाला बिर्ला बाटा, टाटा कुठे आहे हो? सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठे आहे हो?’ असा रोकडा प्रश्न आपल्याला विचारतात. ते सिन्नर तालुक्यातील देशवंडी इथले. अशी माहिती देखील ” दलित साहित्याचे क्रांती विज्ञान” नाशिकच्या बाबुराव बागूल यांनी मांडले. ‘जेव्हा मी जात चोरली’, ‘मरण स्वस्त होत आहे’ हे त्यांचे कथासंग्रह त्या काळात साहित्य चर्चेत महत्त्वाचे ठरले होते. पुढील काळात अरुण काळे सारखा दमदार कवी या प्रवाहातून पुढे आला. दलित चळवळ, दलित मुक्ती लढा, दलित साहित्य यासाठी आमच्या नाशिकच्या लेखकांनी मोठे योगदान दिले आहे, ते विसरता येणार नाही. ख्यातनाम विचारवंत रावसाहेब कसबे यांचे वास्तव्य आपल्या नाशिकला असते याच मला आनंद वाटतो.

पुढे ते आपल्या भाषणात म्हणाले की, समाज परिवर्तनासाठी शैक्षणिक चळवळही इथल्या सहकारी चळवळीतील महर्षींनी सुरू केली. मराठा विद्या प्रसारक समाज संस्था सत्यशोधक विचारांच्या कर्मवीरांनी सुरू केली होती. आज या शैक्षणिक संस्थेने शतकोत्तर वाटचाल सुरू केली आहे. मराठा शिक्षण परिषदेचे दुसरे अधिवेशन नाशिकला १९०८ साली भरणार होते. त्याच्या पुर्वतयारीसाठी आलेले फुले अनुयायी वासुदेव लिंगोजी बिर्जे यांचे नाशिकला प्लेगच्या साथीत निधन झाले. त्यांच्या पत्नी तान्हुबाई बिर्जे या भारतातल्या पहिल्या महिला संपादक. त्या आणि महात्मा फुल्यांना महात्मा ही पदवी देणारे रावबहादुर वंडेकर यांचे वास्तव्य नाशकात असे. छत्रपती शाहू महाराज यांचा नाशिक जिल्ह्याशी अतिशय निकटचा संपर्क होता. कर्मवीर गणपत दादा मोरे यांनी जातीप्रथेविरुद्ध बंड पुकारले. त्यावेळी गणपत दादा मोरे यांना राजर्षी शाहू महाराज थेट त्यांची घरी भेटायला गेले होते. नाशिक जिल्ह्यात शिक्षणासाठी वसतिगृहांची जी चळवळ सुरू झाली तिला बळ देण्याचे काम छत्रपती शाहू महाराजांनी केले होते.

महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व लोकसभेत केले आणि त्यांच्या कारकीर्दीतच ओझरला मिग विमानाचा कारखाना सुरू झाला. नाशिक जिल्हा सामाजिक परिवर्तनाला अनुकूल जिल्हा आहे. त्यामुळे येथून दादासाहेब गायकवाड लोकसभेत निवडून गेले होते. कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांनी साम्यवादी चळवळीत मोठे योगदान दिले ते आमच्या जिल्ह्यातलेच. अनेक कर्तृत्ववान आणि कर्तबगार माणसांनी जिल्ह्याचा इतिहास घडविला आहे. तसेच सामान्य माणसांनी समाज बदलासाठी शिक्षणाला मदत केलेली दिसून येते. अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.

मराठी साहित्य संमेलन हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक मानबिंदू असलेला सोहळा आहे. त्याला सारस्वतांचा मेळा म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. साहित्य संमेलनात राजकारण आणि संमेलन याविषयी वेळोवेळी चर्चा होत आली आहे. १९४२ च्या साहित्य संमेलनात ‘साहित्य आणि राजकारण वेगळे नाही’ याचा निर्वाळा आचार्य अत्रे यांनी दिला होता. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी १९६० सालीच साहित्य संस्कृती मंडळ, विश्वकोश मंडळ स्थापन करून साहित्य संवर्धन, ज्ञानसंवर्धन यांना गती दिल्याचे आपण जाणतो. आमचे नेते शरद पवार हे स्वतः अनेक साहित्य संमेलनांना उपस्थित राहिले आहेत. आतापर्यंत चार संमेलनाचे उद्घाटन त्यांनी केले आहे. त्यांची भाषणे साहित्य मंचावर कधीच राजकीय स्वरूपाची नसतात. कराड येथे झालेल्या साहित्य संमेलनाचे उद्घाटन माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांनी केले होते. त्यावेळी त्यांनी आपल्या भाषणात केवळ राजकीय चर्चा केली नाही तर मराठी साहित्यातील रससिद्धांतावर त्यांनी भाष्य केले होते.

साहित्यकांबद्दल बोलताना स्वागताध्यक्ष छगन भुजबळ म्हणाले नाशिकचा माणूस दुसऱ्याला भरभरून देत असतो. उदारता हा नाशिककरांचा गुण आहे. त्या बळावरच आम्ही तुमचे स्वागत करीत आहोत. साहित्य संमेलनाची आखणी करताना आपल्याला राजाश्रय हवा असतो. शासनाने तो दिला पाहिजे असेच माझे मत आहे. तुम्ही मंडळी राजकीय पार्श्वभूमी लक्षात घेऊन कथा, कादंबऱ्या रचत असता. वात्रटिकांसाठी राजकीय पुढाऱ्याइतका मसाला तुम्हाला कोणी पुरवत नाही. तरीसुद्धा साहित्य संमेलनाच्या मंचावर राजकीय नेत्याने असू नये असे काहींना वाटते, ते मला उचित वाटत नाही. तुम्ही तुमचे स्वातंत्र्य अबाधित ठेवा. ‘राज्यकर्त्यांनो तुम्ही चु्कता आहात’ हे सांगण्याचा तुमचा अधिकार आम्ही मान्य करतो. मी एक वाचक आहे. सार्वजनिक जीवनात मी फुले-शाहु-आंबेडकरांच्या विचारांनी वाटचाल करीत असतो. महात्मा फुल्यांनी दुसर्‍या साहित्य संमेलनाचे निमंत्रण १८८५ साली नाकारले होते. त्यांचे म्हणणे होते की “साहित्यकारांनी जातीनिर्मुलनाची भूमिका घेतली पाहिजे.” ते म्हणत असत,
“थोडे दिन तरी मद्य वर्ज्य करा, तोच पैसा भरा ग्रंथांसाठी.
ग्रंथ वाचताना मनी शोध करा, देऊ नका थारा वैरभावा.”
महात्मा फुले पुढे म्हणतात,
” खिस्त महमद मांग ब्राह्मणाशी धरावे पोटाशी बंधुपरी.”
सद्विवेकाविन सर्व भांबावले, रक्तपाती झाले जोती म्हणे, या शब्दात त्यांनी हिंसेचा, रक्तपाताचा निषेध केलेला आहे. महात्मा फुल्यांनी लिहिलेला शेतकर्‍याचा आसूड आजही कडाडतो आहे. गेले एक वर्षे राजधानीत संघर्ष करणार्‍या बळिराजापुढे दिल्लीकरांना नमावे लागलेले आहे.

पुढे छगन भुजबळ म्हणाले फुले म्हणायचे ” इडापिडा टळो आणि बळीचे राज्य येवो.” आता लोक म्हणतात, “ईडीपिडा टळो आणि लोकशाही बलवान होवो” शाहु महाराजांचे नाशिकवर विशेष प्रेम होते. बाबासाहेबांनी नाशिकच्या दादासाहेब गायकवाडांना लिहिलेल्या पत्रांचा महाग्रंथ राज्य शासनाने २१ व्या खंडाच्या रुपाने प्रसिद्ध केलेला आहे. आमच्या नाशिकच्या महाराजा सयाजीरावांची कीर्ती त्रिखंडात गाजलेली आहे. त्यांनी सयाजी विजय मालेतून प्रकाशित केलेले बुद्धचरित्र वाचून बाबासाहेब बुद्धाकडे वळले. त्यांनी या मालिकेत प्रकाशित केलेली ३००हुन अधिक पुस्तके पुन्हा प्रकाशित व्हायला हवीत असे माझे मत आहे. इतकी ती मोलाची आहेत. त्यांनीच १९०५ साली भारतात शिक्षण प्रथम सक्तीचे, सार्वत्रिक आणि मोफत केले. आधुनिक गुजरात सयाजीरावांनी घडवला, हे सांगताना मला अभिमान वाटतो.

महात्मा फुल्यांनी जाती निर्मूलनाचा विषय संमेलनात घेत नाही म्हणून या साहित्य संमेलनाचे निमंत्रण नाकारले होते. आज त्यांचा लहानसा अनुयायी छगन भुजबळ या मंचावरुन तुमचे स्वागत करतो आहे. हा बदल लक्षात तर घ्याल की नाही? नारळीकर- ठालेपाटील आणि भुजबळ एका मंचावर साहित्य सोहळा साजरा करीत आहेत. हा काळ आर्टीफिशियल इंटीलिजन्सचा आहे. आम्ही नाशिककरांनी तुमच्यासाठी सर्व स्वागताची तयारी केली आहे. त्यातून कुठे काही उणे भासल्यास ते आमचे आहे. ते आमच्याकडे देऊन जा असे आवाहन देखील त्यांनी केले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

वा रे बहाद्दर! वाहतूक कोंडीत चोरट्यांनी चक्क लढाऊ विमानाचे चाकच केले लंपास

Next Post

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी साहित्य संमेलनाला अशा दिल्या शुभेच्छा

Next Post
udhav thakre 1

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी साहित्य संमेलनाला अशा दिल्या शुभेच्छा

ताज्या बातम्या

rain1

या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

मे 19, 2025
court 1

शेजा-यावर प्राणघातक हल्ला….न्यायालयाने सुनावली एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

मे 19, 2025
शेती व शेतकऱ्यांच्या भाग्योदयासाठी एक राष्ट्र एक कृषी व एक टीम 8 1024x682 1

शेती व शेतकऱ्यांच्या भाग्योदयासाठी एक राष्ट्र – एक कृषी व एक टीम…केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांची घोषणा

मे 19, 2025
IMG 20250518 WA0139 1024x683 1

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी

मे 19, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी दूरचे प्रवास टाळलेले बरे, जाणून घ्या, सोमवार, १९ मेचे राशिभविष्य

मे 19, 2025
bjp11

भाजप जिल्हाध्यक्षांच्या यादी वरून घमासान; नक्की असं काय घडलं?

मे 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011