मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय रेल्वे देशाची जीवनवाहिनी मानली जाते. काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत आणि सोरटी सोमनाथ पासून ते कोलकाता पर्यंत देशाच्या कोणत्याही भागात आपल्याला रेल्वेने प्रवास करता येतो. रेल्वेचा प्रवास हा सुलभ आणि सुखकर मानला जातो. परंतु त्याचबरोबर या प्रवासात जे सामान सोबत न्यावे लागते, या सामानाची आपल्यालाच काळजी घ्यावी लागते. अन्यथा ते चोरीला जाऊ शकते. चोरीच्या भीतीने अनेकजण रेल्वे प्रवासात रात्रंदिवस सामानाची काळजी करतात.
आता यापुढे अशी काळजी करण्याची गरज राहणार नाही. कारण रेल्वे प्रवाशांना प्रवासादरम्यान सामान हरवण्याची भीती राहणार नाही. हरवलेल्या सामानाचा शोध घेण्यासाठी भारतीय रेल्वेने एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. या अंतर्गत प्रवाशी त्याच्या हरवलेल्या सामानाचा माग काढू शकतो. तो त्यांना सहज परत मिळवू शकतो. प्रवाशांची तसेच त्यांच्या सामानाची सुरक्षा सुनिश्चित करण्यात रेल्वे संरक्षण दल महत्त्वाची भूमिका बजावते. आरपीएफने या दिशेने मिशन अमानत सुरू केले आहे. त्यामुळे प्रवाशांना हरवलेले सामान सहज मिळेल.
पश्चिम रेल्वेने एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, प्रवाशांना हरवलेले सामान परत मिळणे सोपे व्हावे यासाठी आरपीएफने एक नवीन पुढाकार घेतला आहे. मिशन अमानत अंतर्गत, हरवलेल्या वस्तूंची माहिती छायाचित्रांसह रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर अपलोड केली जाईल. मिशन अमानत आरपीएफ वेबसाइट http://wr.indianrailways.gov.in वर पोस्ट केलेल्या छायाचित्रांसह प्रवासी सामानाचा तपशील तपासू शकतात.
पश्चिम रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकार्यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, गेल्या वर्षी रेल्वे संरक्षण दलाने एकूण १३१७ चोरट्यांकडून सुमारे २.५८ कोटी रुपयांचा माल जप्त केला होता. पडताळणीनंतर त्यांनी ते मूळ मालकांना दिले आहेत. ऑपरेशन मिशन अमानत अंतर्गत रेल्वे संरक्षण दल चांगल्या प्रवाशांना ही सेवा पुरवते. प्रवाशांच्या सुरक्षित आणि आरामदायी प्रवासासाठी आरपीएफ चोवीस तास काम करत असते. रेल्वे संरक्षण दलाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करून आणि रेल्वे परिसरात गुन्हेगारी शोधून देशभरातील राष्ट्रीय वाहतूकदाराच्या मोठ्या मालमत्तेचे रक्षण करण्याची जबाबदारी पार पाडली आहे.