नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. दोन्हा सभागृहांमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी सुरू आहे. राष्ट्रतींच्या अभिभाषणावरील चर्चे दरम्यान काँग्रेस खासगार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढविला. या भाषणातील काही भाग वगळला गेल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकारावरून राहुल गांधी यांनी संताप व्यक्त केला. सोबतच पंतप्रधान आरोपांना उत्तर देत नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी आणि गौतम अदाणी यांच्यातील मित्रत्वाच्या संबंधांवर टीकास्र सोडले होते. या भाषणातला काही भाग रेकॉर्डवर येऊ नये, म्हणून वगळण्यात आल्याचा दावा केला जात आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर राहुल गांधी अधिकच आक्रमक झाले आहेत. माझ्या भाषणातले शब्द का वगळण्यात आले? माझ्या प्रश्नांना पंतप्रधान उत्तर का देत नाहीत? गौतम अदाणींना का वाचविले जात आहे?, असे सवाल राहुल गांधींनी माध्यमांसोबत बोलताना उपस्थित केले.
भाषणातील भाग वगळणे म्हणजे काय?
एखाद्या सदस्याच्या भाषणाचा भाग रेकॉर्डमधून काढून टाकणे ही नियमित प्रक्रिया आहे. सभागृहाचे अध्यक्ष यासंदर्भातला निर्णय घेऊ शकतात. लोकसभेच्या नियम ३८० नुसार, सदस्याने वापरलेले शब्द हे अपमानजनक, आक्षेपार्ह किंवा असंसदीय असल्याचे अध्यक्षांना वाटले तर ते शब्द सभागृहाच्या कामकाजातून वगळण्याचे आदेश देऊ शकतात. नियमा ३८१ नुसार, सभागृह अध्यक्षांनी जो भाग कामकाजातून वगळण्याचे आदेश दिलेले असतात, असा भाग तिथून वगळून त्या ठिकाणी ‘सभा अध्यक्षांच्या आदेशानुसार वगळण्यात आले’, अशी तळटीप नमूद केली जाते.
शब्द वगळल्यानंतर पुढे काय?
कोणताही शब्द किंवा संदर्भ संसदीय कामकाजातून वगळल्यानंतर तो कामकाजाच्या नोंदीतून पूर्णपणे काढून टाकला जातो. वृत्तसंस्थांसह कुणालाही तो शब्द कामकाजाच्या वार्तांकनासाठी वापरता येत नाही. असंसदीय शब्द थेट प्रक्षेपणात आला असला, तरी तो कामकाजातून काढला जातो. कामकाजाच्या ऑडिओ रेकॉर्डिंमध्ये त्या शब्दाच्या ठिकाणी ‘बीप’ टाकला जातो.
Rahul Gandhi Loksabha Speech Questions Removed Official