नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय निवडणूक आयोगाने आज महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. त्यानुसार पंजाब विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आता २० फेब्रुवारीला मतदान होणार आहे. यापूर्वी ही तारीख १४ फेब्रुवारी ही होती. हे मतदान पुढे का ढकलले जात आहे, त्याचे कारणही आयोगाने दिले आहे.
पंजाबमध्ये १४ फेब्रुवारी रोजी मतदान घेण्यात येऊ नये, अशी आग्रही मागणी विविध राजकीय पक्षांनी केली होती. मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नीसह सर्वच पक्षांनी यासंदर्भात आयोगाला पत्र दिले होते. १४ फेब्रुवारी ही तारीख गैरसोयीची आहे कारण १६ फेब्रुवारी रोजी संत रविदास जयंती आहे. याच जयंतीनिमित्त पंजाबमधील अनेक नागरिक हे वाराणसी येथे जातात. त्यामुळे १४ फेब्रुवारी रोजीच्या मतदानावर त्याचा मोठा परिणाम होईल. मतदानाची टक्केवारी घसरेल. इच्छा असूनही अनेकांना मतदान करता येणार नाही, असे राजकीय पक्षांनी आयोगाला पटवून दिले. त्याची गंभीर दखल आयोगाने घेतली. म्हणूनच आता २० फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. तर, यापूर्वीच जाहीर केल्याप्रमाणे पाचही राज्यांच्या निवडणुकीचा निकाल हा १० मार्च रोजी लागणार आहे. तसे आयोगाने आज स्पष्ट केले आहे.