मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंजाबमध्ये आप सरकारला सर्व बाजुंनी घेरणं सुरू झालेलं आहे. मुख्य म्हणजे हा घेराव राजकीय नसून तो सर्वसामान्यांनी व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घातलेला आहे. त्यामुळे त्याचा थेट परिणाम राज्यातील विकासकामांवर होऊ लागला आहे. सरकारने घेतलेले निर्णय व गुन्हेगारीव विश्वावर अंकुश मिळविण्यासाठी होत असलेली दिरंगाई या दोन्ही कारणांनी आप सरकारने स्वतःची डोकेदुखी वाढवून घेतली आहे.
पंबाजचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पद स्वीकारल्यानंतर देशभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. पण त्यानंतरच्या घडामोडी त्यांच्याविरोधात राज्यातच रोष वाढविणाऱ्या ठरत आहेत. फौजा सिंह सरारी नावाचे मंत्री सरकारमधून बाहेर पडले आहेत आणि त्यांनी आप सरकार भ्रष्टाचारी असल्याची टीका केली आहे. सरकारमधून बाहेर पडताच फौजा सिंह यांनी तोफ डागल्यामुळे भगवंत मान टेंशनमध्ये आले आहेत. राज्याचे पीसीएस अधिकारी धालीवाल यांच्याविरोधात सरकारने गुन्हा नोंदविल्यामुळे सर्व पीसीएस अधिकारी सामूहिक रजेवर गेले आहेत. तर आयएएस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे इतर अधिकाऱ्यांनीही रजेवर जाण्याचा इशारा दिला आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था, शेतकरी आंदोलने आणि अधिकाऱ्यांनी केलेले बंड सरकारसाठी अडचणी निर्माण करणारे ठरत आहे.
नितीन गडकरींचे लक्ष
पंजाबमधील झिरा या गावात आणि दिल्ली-कटरा महामार्गासाठी होणारं भूसंपादन या विरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्यामुळे त्यांनी तीव्र आंदोलन छेडले आहे. टोल नाक्यांवरही धरणे आंदोलनं सुरू आहेत. राज्य सरकार ही प्रकरणं हाताळू शकलं नाही, तर भविष्यातील सार्वजनिक खासगी सहभागाच्या प्रकल्पांवर परिणम होईल, असा इशारा एनएचएआयने दिला आहे. खुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्य सरकारला पत्र लिहून कामांना गती देण्याचे आवाहन केले आहे.
Punjab AAP Government Trouble Minister Allegation
Bhagwant Mann Arvind Kejriwal Politics Resign