पुणे – सध्याचे युग माहितीचे असून सर्व देशात २१ व्या शतकात माहिती क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. जगातील अनेक विकसित देशांमध्ये याबाबत मोठी स्पर्धा आहे. तसेच अनेक देशांत माहितीचे युद्धही सुरू झाले आहे. माहिती आणि नवीन तंत्रज्ञान अतिशय वेगाने विकसित होत आहेत.
वायफाय, ब्लूटूथ, सोशल मीडिया इत्यादी सर्व गोष्टी या क्षेत्रातील बदलांचा परिणाम आहेत. एकीकडे, या प्लॅटफॉर्म आणि तंत्रज्ञानाने जगाची पारंपारिक रचना बदलली आहे. त्याच बरोबर समांतर त्यांचा गैरवापरही मोठ्या प्रमाणात होत आहे. अनेक हॅकर्स हे वैयक्तिक डेटाचा चुकीच्या पद्धतीने वापर करून माहितीची चोरी करत आहेत. त्यामुळे वायफाय वापरणाऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.
गेल्या काही वर्षांत अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, त्यामध्ये सार्वजनिक वायफाय वापरणाऱ्यांना लक्ष्य करण्यात आले आहे. अनेकदा आपल्यापैकी बहुतेक जण विमानतळ, रेल्वे स्टेशन, रेस्टॉरंट किंवा इतर कोणत्याही ठिकाणी वायफाय मिळताच त्याचा आनंद घेऊ लागतात. आपणही करत असाल तर सावधान!
पब्लिक वायफाय वापरत असताना आपली छोटीशी चूक झाल्यास मोठे नुकसान होऊ शकते. वास्तविक, सार्वजनिक वायफाय एकाच वेळी अनेक लोक वापरतात, ज्याचा फायदा हॅकर्स घेतात. सार्वजनिक वायफायशी कनेक्ट होताच तुमच्या मोबाइलवरील सर्व माहिती हॅकर्सपर्यंत पोहोचण्याची शक्यता असते. अशावेळी तुमच्या डेटाचा गैरवापर होऊ शकतो. तुमच्या बँक खात्यातूनही पैसे देखील गायब होऊ शकतात.
देशातील अनेक मोठ्या बँका आपल्या ग्राहकांना याबाबत जागरूक करत आहेत. पब्लिक वायफायच्या माध्यमातून तुमची महत्त्वाची माहिती फिशिंगच्या मदतीने लीक होऊ शकते, असा इशारा त्यांनी त्यांच्या ग्राहकांना दिला आहे. यासाठी विशेष काळजी घ्या की, तुम्ही सार्वजनिक वायफायशी कनेक्ट होता, तेव्हा त्याची विश्वासार्हता नीट तपासा. जर तुम्ही असे केले नाही तर तुम्हाला सहज फसविले जाऊ शकता. याशिवाय, तुम्ही सार्वजनिक वायफायशी कनेक्ट असाल, त्या काळात कोणतीही बँकिंग व्यवहार करू नका.