यवतमाळ (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भाजपला जसे उद्धव ठाकरे नको होते, तसेच एकनाथ शिंदेसुद्धा त्यांना नको असल्याचे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे आणि भाजप यांची युती होते का, हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. परिस्थिती अनुकूल असली तर एकनाथ शिंदेंना भाजप सोबत घेईल असेही आंबेडकर यावेळी म्हणाले. यवतमाळमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
पुढे ते म्हणाले की, मतदार हा राजा आहे. त्या राजाला कोणाला पदावर बसवावं वाटतं तो त्याला बसवेल. तो निर्णय आनंदानं स्विकारावा असेही आंबेडकर म्हणाले. परंतु; सध्या जे राज्यात चाललं आहे ते राजकारणाच्या दृष्टीनं योग्य नाही. ही काही गादीची लढाई नाही. ज्याप्रमाणे भाजपला उद्धव ठाकरे हे नको होते, तसेच त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा नको आहेत. त्यांना परिस्थिती अनुकूल दिसली तरच एकनाथ शिंदे यांना निवडणुकांमध्ये सोबत घेतील असे आंबेडकर म्हणाले. त्यामुळे आगामी जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपालिका, महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे आणि भाजप यांची युती होते का हे पाहावं लागेल असेही ते म्हणाले.
सध्या अंधेरी पूर्व विधानसभेची पोटनिवडणूक लागली असून या निवडणुकीसंदर्भातदेखील प्रकाश आंबेडकर यांनी मत मांडलं. ते म्हणाले की, या निवडणुकीसंदर्भात आम्ही वेट आणि वॉचच्या भूमिकेत आहोत. ही निवडणूक दोन्ही शिवसेनेसाठी महत्वाची आहे. या निवडणुकीत भाजपचा उमेदवार असल्यानं त्याला पाठिंबा देण्याचा विषय नाही. आमच्याकडे अद्याप कोणीही पाठिंबा मागितला नसल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले. सुप्रीम कोर्टाने जे अनियंत्रित अधिकार निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्याचं काय होऊ शकत याची माहिती मी लोकांसमोर मांडली होती असेही आंबेडकर यावेळी म्हणाले. तर युतीबाबत ते म्हणाले की, पहिलं प्राध्यान कोणाला हा विषय नाही. आमच्या पक्षाच्या अध्यक्ष रेखा ठाकूर यांनी सांगितले होते की, काँग्रेस किंवा शिवसेना यांच्याबरोबर युती करु, या भूमिकेला कोणी प्रतिसाद दिला नसल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले. जो कोणी पहिला प्रस्ताव देईल, जो सोयीचा वाटेल त्यांच्यासोबत जाण्याची भूमिका घेऊ असे आंबेडकर यावेळी म्हणाले.
Prakash Ambedkar on BJP Politics
Shivsena Uddhav Thackeray Eknath Shinde