मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या सहा महिन्यांपासून महाराष्ट्रातील राजकारणाने अनोखे वळण घेतल्यानंतर एक बऱ्याच गोष्टी पुन्हा सुरळित झाल्या. पण शिवसेना आणि धनुष्यबाण कुणाचे आहेत, हे मात्र स्पष्ट झालेले नाही. पण, दोन्ही गटांचा निवडणूक आयोगापुढे युक्तिवाद पूर्ण झाला आहे. आणि आता प्रतिक्षा आहे ती केवळ ३० जानेवारीला होणाऱ्या अंतिम निकालाची. तत्पूर्वी उद्धव ठाकरे यांचे पक्ष प्रमुख पदाची मुदत २३ जानेवारपर्यंत आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
ठाकरे आणि शिंदे गटाचा युक्तिवाद संपल्यानंतर निवडणूक आयोगाने लेखी उत्तर सादर करण्याचे आदेश दोन्ही गटांना दिले आहेत. शिवसेनेत फुट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपण बाळासाहेबांची शिवसेना असल्याचा दावा केला. तसं नावही आयोगाने मंजूर केलं. पण त्याचवेळी उद्धव ठाकरे यांच्या पदावरच प्रश्न उपस्थित करण्याचं काम शिंदे गटाने केलं. बाळासाहेबांच्या निधनानंतर उद्धव यांनी शिवसेना पक्षप्रमुख हे पद निर्माण केलं. ते घटनाबाह्य असून त्यासाठी त्यांनी कुणालाही विश्वासात घेतलं नाही, असं शिंदे गटाचं म्हणणं आहे. त्याचवेळी शिवसेना प्रमुख फक्त बाळासाहेबच आहेत आणि तेच राहतील, अशी भूमिका शिवसैनिकांनी आधीच स्पष्ट केली होती. पण तरीही २०१३ आणि २०१८ अश्या दोन्ही प्रसंगांना उद्धव ठाकरेंनी शिवसेना पक्ष प्रमुख हे पद स्वतःसाठी निर्माण केलं, असा आरोप शिंदे गटाने केला आहे.
२३ जानेवारीनंतर प्रश्न
उद्धव ठाकरेंची शिवसेना पक्षप्रमुख पदाची मुदत येत्या २३ जानेवारीला संपत आहे. त्यानंतर काय होणार, असा प्रश्न आहे. दरम्यान ठाकरे गटाने निवडणूक आयोगाला प्रक्रियेसाठी वेळ द्या किंवा मुदतवाढ द्या, अशी मागणी केली होती. त्यावरही अद्याप निवडणूक आयोगाने निर्णय दिलेला नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या पदाचे काय होणार, हा प्रश्न कायम आहे.
Politics Shivsena Chief Uddhav Thackeray Trouble Election Commission