मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अंधेरी पूर्व मतदारसंघात शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे निधन झाल्याने त्याजागी होत असलेली पोटनिवडणूक सध्या राज्यभरात चर्चेचा विषय ठरली आहे. कारण, शिवसेनेत पडलेली फूट, राजकारण, कुरघोड्या यामुळे मुंबईतील वातावरण तापले आहे. त्यातच उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार आणि दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा यांना अडचणीत आणण्याचे अनेक प्रयत्न झाले. अखेर आता त्यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. या पोटनिवडणुकीत मात्र सध्या जोरदार चर्चा शिंदे गटाचीच होत आहे. कारण, ही जागा शिवसेनेची असताना बाळासाहेबांची शिवसेना असलेल्या शिंदे गटाने येथे उमेदवार का दिला नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शिवसेनेत फूट पाडून एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांच्या जोरावर भाजपच्या साथीने राज्यात सत्ता स्थापन केली. तेव्हापासून शिंदे गटाने एकच दावा केला आहे की, खरी शिवसेना आम्ही आहोत. त्यानंतर न्यायलयीन लढाई, निवडणूक आयोगाकडील तक्रार या सर्व बाबी घडल्या. शिवसेना हे नाव आणि चिन्ह धनुष्यबाण हे सुद्धा गोठवले गेले. त्यानंतरही कुरघोडीचे राजकारण सुरू आहे. ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा यांचा मुंबई महापालिकेने राजीनामा न स्विकारणे, त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेणे, न्यायालयाच्या निर्देशानंतर महापालिकेने तो मंजूर करणे यावरुन राज्यभरातच सध्या ही निवडणूक चर्चेची बनली आहे.
शिंदे गट सातत्याने दावा करीत आहे की, तेच खरी शिवसेना आहे. ठाकरेंचे तेच खरे वारसदार आहेत. निवडणूक आयोगाकडून शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळाले आहे. मात्र, शिंदे गटाने अंधेरी निवडणुकीत त्यांचा उमेदवार दिलेला नाही. शिवसेनेची जागा असतानाही शिंदे गटाने उमेदवार का दिला नाही, असा प्रश्न सर्वत्र विचारला जात आहे. याउलट शिंदे गटाचा मित्र पक्ष असलेल्या भाजपने उमेदवार दिला असून शिंदे गटाने भाजप उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्येही संभ्रमावस्था आहे. यापुढील काळातही शिवसेनेच्या जागांवर भाजप दावा करणार का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे, यासंदर्भात एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटातील अन्य कुणीही काहीही बोलत नसल्याने शिंदे समर्थकांमध्ये विविध चर्चा रंगत आहेत.
गुरुवारी तीन अर्ज दाखल
भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या 166 – अंधेरी (पूर्व) या मतदारसंघाच्या एका जागेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या जागेसाठी आजअखेर 3 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. अंधेरी (पूर्व) विधानसभा मतदारसंघाकरिता श्री. राकेश विश्वनाथ अरोरा (क्रांतिकारी जय हिंद सेना) आणि (हिंदुस्तान जनता पार्टी), श्री. मिलिंद काशिनाथ कांबळे (अपक्ष) आणि श्रीमती नीना गणपत खेडेकर (अपक्ष) यांनी आपली नामनिर्देशन पत्रे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केली आहेत.
असा आहे निवडणुकीचा कार्यक्रम
निवडणुकीच्या नियोजित कार्यक्रमानुसार १४ ऑक्टोबर रोजी नामनिर्देशन पत्रे सादर करणे, १५ ऑक्टोबर रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी, १७ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख आहे. तर ३ नोव्हेंबर रोजी मतदान, ६ नोव्हेंबर रोजी मतमोजणी व ८ नोव्हेंबर रोजी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. मतदारांची ओळख पटावी म्हणून नेमकी कोणती ओळखपत्रे लागतील, त्याची यादी निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे.
Politics Shivsena Andheri Bypoll Election Candidate
BJP Uddhav Thackeray Eknath Shinde