मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (रिपाइं) प्रमुख नेते तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आगामी लोकसभा निवडणुकीबाबत मोठे भाष्य केले आहे. लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. ते सध्या राज्यसभेचे खासदार आहेत. आणि शिर्डी मतदारसंघातून त्यांनी लोकसभा लढविण्याची इच्छा बोलून दाखविली आहे. त्यामुळे विद्यमान खासदार सुजय विखे-पाटील यांचे काय होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. सध्या भाजप आणि रिपाइंची युती आहे. त्यातच भाजपचे नेते राम शिंदे यांनीही शिर्डीतून लोकसभा निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आता शिर्डीचा उमेदवार कोण राहणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
आता पुन्हा एकदा एका मुलाखतीत त्यांनी लोकसभेवर लोकसभा निवडणूक लढवून खासदार होण्याची लोकसभा सदस्य होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) अध्यक्ष रामदास आठवले सध्या केंद्रात सामाजिक न्याय मंत्री आहेत. राज्यसभेत खासदार असणारे रामदास आठवले यांची खासदारकीची मुदत सन २०२६मध्ये संपणार आहे. त्यामुळे अजून किमान तीन वर्षं तरी ते राज्यसभेचे खासदार असतील. मात्र, त्यांनी पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची इच्छा व्यक्त केली आहे. नुकत्याच एका दिलेल्या मुलाखतीमध्ये रामदास आठवलेंनी महाराष्ट्रातील एका मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली असून त्यासंदर्भात केंद्रातील भाजपा नेत्यांशीही चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले आहेत.
आठवले म्हणाले की काँग्रेस आघाडीमध्ये १९९८ मध्ये मी पहिल्यांदा खासदार झालो. १९९९ मध्ये दुसऱ्यांदा झालो. २००४ मध्ये तिसऱ्यांदा खासदार झालो. चौथ्यांदा शिर्डीतून लढलो तेव्हा हरलो. मला युपीएच्या काळात मंत्रीपद नव्हते दिले,वास्तविक त्यांनी आरपीआयला सत्तेत सहभागी करून घ्यायला हवे होते. मात्र सोनिया गांधी, शरद पवारांनी आम्हाला ते काहीच दिले नाही. त्यावर मला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले की, शिवशक्तीसोबत भीमशक्ती यायला हवी. त्यानंतर शिवसेना, भाजपासह रिपाइं निवडणुकीत सहभागी झाली. २०१४ ला लोकसभा निवडणुकीत ४२ जागा आम्ही निवडून आणल्या. विधानसभेत भाजपा, शिवसेनेचे सरकार बनले. रिपाइंने त्यात पाठिंबा दिला, असे रामदास आठवले यांनी यावेळी सांगितले.
तसेच आता मी दुसऱ्यांदा राज्यसभेत आलो आहे. २०२६ पर्यंत मी खासदार असेन. पण माझी शिर्डीतून निवडणूक लढण्याची इच्छा आहे. मला तशी संधी मिळाली, तर मी शिर्डीतून निवडणूक लढवेन. मी लोकसभेचा माणूस आहे. देवेंद्र फडणवीस, राधाकृष्ण विखे पाटील यांना मी प्रस्ताव दिलेला आहे. पण अजून केंद्रातील नेत्यांशी मी बोललेलो नाही. मला संधी मिळाली तर मी तिथून जिंकून येऊ शकतो, असेही रामदास आठवले म्हणाले.
विशेष म्हणजे आठवलेंनी या मुलाखतीमध्ये वेगवेगळ्या राजकीय मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी त्यांच्या राजकारणात सक्रीय होण्याबद्दलच्या आठवणीही सांगितल्या आहेत. मी कॉलेजच्या जीवनात असतानाच दलित पँथरची चळवळ चालू होती. मी कॉलेजसाठी मुंबईत आल्यानंतर दलित पँथर चळवळीत मी सहभागी झालो. तिथून पुढे राजकारणात आलो, असेही रामदास आठवले म्हणाले. यावेळी बोलताना आठवलेंनी त्यांच्या पहिल्या मंत्रीपदाचीही आठवण सांगितली आहे. मी तेव्हा शिकत असतानाच मला अचानक मंत्री बनण्याची संधी मिळाली. मी हॉस्टेलमध्ये राहायचो. हॉस्टेलवरून मी थेट मंत्रालयात गेलो. कमी वयात मी महाराष्ट्रात मंत्री झालो होतो, असेही रामदास आठवले म्हणाले.
आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आपण महाराष्ट्रातल्या शिर्डी लोकसभा मतदार संघातून स्वत: निवडणूक लढणार आहोत, असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले आहेत. याबाबतीत प्राथमिक स्तरावरची चर्चा भाजपच्या पदाधिकाऱ्याशी झालेली आहे. तसेच राज्यातल्या आणखी दोन लोकसभेच्या जागा आरपीआय लढवेल, असे त्यांनी सांगितले. त्यांनी पुन्हा शिर्डी लोकसभा मतदारसंघातून खासदारकी लढवण्याची इच्छा व्यक्त केली.२००९ साली आठवले यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र, त्यावेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर रामदास आठवले २०१४ साली भाजपच्या कोट्यातून राज्यसभेचे खासदार आणि थेट केंद्रात राज्यमंत्री झाले. तसेच शिर्डी येथे २८ मे रोजी आरपीआयचे राज्यस्तरीय अधिवेशन होणार आहे. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांना अधिवेशनाचे निमंत्रण देणार असल्याची माहिती आठवले यांनी दिली.
Politics RPI Ramdas Athawale Loksabha election Constituency