मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्या पंकजा मुंडे यांनी पक्षाच्या विरोधात एल्गार पुकारला असून एकनाथ खडसे यांनी सुद्धा भाजपबद्दल मोठे विधान केले आहे. पंकजा यांनी दोन दिवसांपूर्वी भाजप आपला पक्ष नसल्याचे विधान जाहीरपणे केले होते. त्यानंतर त्यांच्याबद्दल विविध चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या होत्या. आता खडसेंनीही या चर्चेमध्ये उडी घेतली आहे.
पंकजा मुंडे यांनी गोपिनाथ गडावरून आणखी एक विधान केले आणि त्यावेळी एकनाथ खडसे यांचीही उपस्थिती होती. एकनाथ खडसे यांनी भाजपवर नाराज होऊन राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. पंकजा मुंडे यांनी यावेळी कुठलीही भूमिका छातीठोकपणे घेईल, असे स्पष्ट करताना अमित शहा यांच्याशी मुक्तपणे चर्चा करेन, असे सांगितले आहे. तर विनोद तावडे यांनी एकनाथ खडसे यांना पक्षात परत येण्याचे आवाहन केले होते. त्यावर एकनाथ खडसे यांनी भाष्य केले.
तसेच पंकजा यांच्यावर होत असलेल्या अन्यायाबद्दलही त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. ‘पंकजा निवडणुकीत पराभूत झाल्यावर त्यांना पक्षातून सर्वच पदांवरून डावलण्यात आले. एवढी वर्षे ज्या पक्षात सेवा दिली त्याच पक्षाकडून त्यांच्यावर अन्याय होत आहे. या भागातील अनके साखर कारखान्यांना सरकारने मदत केली. पण पंकजा यांचा कारखाना डावलण्यात आला. हे जाणीवपूर्वक करण्यात येत आहे,’ असे एकनाथ खडसे म्हणाले. तर विनोद तावडे यांच्या आवाहनावर भाष्य करताना ते म्हणाले की, कर्नाटकमधील पराभवाच्या पार्श्वभूमीवर तावडे यांना जुन्या मंडळींनी एकत्र यावे, असे वाटत असावे. तसेच यावेळी त्यांनी तावडे यांच्यासोबत असलेल्या मैत्रीतील आठवणींनाही उजाळा दिला.
‘भाजपमध्ये जाणार नाही’
जुने लोक एकत्र आले तर निवडणुका जिंकता येतील, असे तावडे यांना वाटत आहे. त्यामुळे त्यांनी मैत्रीपोटी हे विधान केले असेल. पण मी कुठल्याही परिस्थितीत भाजपमध्ये परत जाणार नाही, असे खडसे यांनी स्पष्ट केले. रावेर मतदारसंघाच्या बाबतीत अद्याप निर्णय झालेला नाही. महाविकास आघाडीत जागावाटपावर चर्चा झालेली नाही, असेही ते म्हणाले.
Politics BJP NCP Eknath Khadse Pankaja Munde