गंगटोक – प्रत्येकाला पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे, असे केंद्र आणि अनेक राज्य सरकारचे धोरण आहे. कारण शुद्ध पाण्याअभावी नागरिकांना विविध प्रकारचे आजार होतात. सहाजिकच शुद्ध पाणी उपलब्ध होण्यासाठी अनेक नागरिक बाटलीबंद पाण्याचा वापर करतात. परंतु या बाटल्यामुळे प्लॅस्टिक कचरा साचून प्रदूषणात वाढ होते. पर्यायाने पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. त्यामुळे सिक्कीममध्ये बाटलीबंद पाण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात येणार आहे.
राज्याचे मुख्यमंत्री पी. एस. तमांग यांनी घोषणा केली की, हिमालयीन राज्यात दि. १ जानेवारी २०२२ पासून पॅकेज केलेल्या मिनरल वॉटरवर बंदी घालण्यात येईल. तसेच राज्यात ताजे आणि चांगल्या दर्जाचे पाणी उपलब्ध करून देण्यात येईल. सदर बंदी लागू झाल्यानंतर नागरिक नैसर्गिक संसाधनांमधून पाणी निवडतील, कारण प्लॅस्टिकच्या बाटल्यांमध्ये उपलब्ध पाण्यापेक्षा नैसर्गिक स्त्रोतांचे पाणी कितीतरी आरोग्यदायी आहे.
सिक्कीममध्ये आता प्रत्येकाला मिनरल वॉटरच्या बाटल्यांपासून दूर राहावे लागेल आणि नैसर्गिक जलसंपदा निवडावी लागेल. व्यावसायिक आस्थापनांकडे उपलब्ध मिनरल वॉटर बाटल्यांचा सध्याचा साठा साफ करण्यासाठी तीन महिन्यांचा बफर वेळ दिला जात आहे.
सिक्कीम हे नैसर्गिक जलस्रोतांनी समृद्ध राज्य आहे आणि राज्यातील सर्व पर्यावरणीय स्त्रोताद्वारे पाण्याच्या सर्व गरजा पूर्ण केल्या जाऊ शकतात. यावेळी तमांग म्हणाले की, राज्य सरकार बाटलीबंद पिण्याच्या पाण्याचा पुरवठा बाहेरून बंद करण्यासाठी पावले उचलत आहे. विशेषत: उत्तर सिक्कीममध्ये, पर्यटन स्थळांनी पॅकेज केलेल्या पाण्याच्या बाटल्यांवर आधीच बंदी घातली आहे.