मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ठाकरे आणि शिंदे गटातील विविध प्रकारचा संघर्ष आणि कुरघोड्या दिवसेंदिवस उघड होत आहेत. त्यातच आता समोर आले आहे की, ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांना अद्यापही मुंबईत सरकारी निवासस्थान मिळालेले नाही. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना मी १० स्मरणपत्रे पाठविल्याचा खुलासा त्यांनी केला आहे. त्यामुळे शिंदे गटाकडून ठाकरे गटातील नेत्यांची कोंडी केली जात असल्याचे दिसून येत आहे.
घरासंदर्भात त्यांनी १० वेळा मुख्यमंत्री शिंदे एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवले असून अद्यापही कारवाई झाली नसल्याने दानवे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वास्तविक पाहता विधान सभेचे असो की विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते पद हे मंत्रीपदाच्या दर्जाच्या असते,. त्यामुळे दानवे यांना तातडीने मंत्र्यांप्रमाणे बंगला मिळायला हवा होता. मात्र उद्धव ठाकरे गटाचे निष्ठावान कार्यकर्ते असलेले अंबादास दानवे यांनी शिंदे गटावर वारंवार हल्लाबोल केल्याने त्याचा बदला घेतला जात आहे की काय अशी देखील चर्चा सुरू आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना दोन गटामध्ये विभागली आहे. शिंदे यांनी ४० शिवसेना आमदारांसह भाजपसोबत सत्ता स्थापन केली. शिंदे यांनी मुख्यमंत्री तर फडणवीस यांनी उप मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. बंडामुळे राज्यात सत्तांतर झाले असून, सत्ताबदलानंतर विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी अजित पवार यांची निवड झाली. तर विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर शिवसेनेने दावा केला होता. शिवसेनेने विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी मराठवाड्यातील फायरब्रँड नेते अंबादास दानवे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते.
सत्तांतरानंतर काही माजी मंत्र्यांनी बंगले रिकामे केले नव्हते. त्यामुळे नव्या मंत्र्यांना बंगले देण्यात अडचणी येत होत्या. अखेर अनेक बंगले रिकामे झाल्यानंतर नवनिर्वाचित मंत्र्यांना बंगल्यांचं वाटप करण्यात आले आहे. मात्र, या मंत्र्यांना करण्यात आलेल्या बंगले वाटपात शिंदे गटाचे मंत्री दीपक केसकरांना मिळालेला बंगला सगळ्यात भारी असल्याचे म्हटले जात आहे.
महत्वाचे म्हणजे विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदी असताना असलेला ‘देवगिरी’ बंगला खास बाब म्हणून देण्यात आला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी अजित पवार यांचे स्नेहसंबंध असल्याने हा बंगला त्यांना मंजूर करण्यात आल्याची चर्चा होती. खरे म्हणजे मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यानंतर देवगिरी बंगला हा भव्य मानला जातो. फडणवीसांनी मनाचा मोठेपणा दाखवत हा बंगला अजित पवार यांच्याकडे काम ठेवला आहे.
अजित पवार आणि देवगिरी बंगल्याचे नाते अतूट आहे कारण अजित पवारांनी या बंगल्यात जवळपास १६ वर्षाहून अधिक काळ वास्तव्य केले आहे. अजित पवार हे १९९९ ते २०१४ या काळात देवगिरी बंगल्यावरच राहत होते. त्यांनंतर २०१४ ला भाजपची सत्ता आल्यानंतर हा बंगला सुधीर मुनगंटीवार यांना मिळाला. महाविकास आघाडीचे सरकार सन २०१९ आल्यानंतर अजित पवारांना पुन्हा हा बंगला मिळाला होता. मात्र विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते दानवे यांना मात्र शासकीय निवासस्थानासाठी धडपड करावी लागत आहे. तर मराठवाडयातील शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, अतुल सावे यांना चांगले बंगले मिळाले आहेत, एकेकाळी या मंत्र्यांनी दानवे समवेत अनेक आंदोलनात सहभाग घेतला आहे.
आता विरोधी पक्ष नेत्याला मंत्र्याप्रमाणे शासकीय निवासस्थान, प्रशासकीय कामकाज करण्यासाठी आवश्यक तो अधिकारी-कर्मचारी वर्ग घेता येतो. दानवे यांनी निवासस्थानासाठी ११ ऑगस्टपासून ४ वेळा मुख्यमंत्री कार्यालयाकडे पत्र दिले. अधिवेशन सुरू असताना दानवे यांसदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांना भेटले. दानवे यांनी मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी यांना भेटून ४ वेळा पाठपुरावा केला. दानवे यांनी ‘प्रतापगड ( अ-५)’ हा बंगला निवासस्थान म्हणून मिळावा, अशी मागणी केली होती. मात्र मुख्यमंत्री कार्यालयाकडून मंजुरी मिळाली नसल्याने सामान्य प्रशासन विभागाने निवासस्थानाचे वाटप केलेले नाही, असे एका अधिकाऱ्यांनी सांगितले. दानवे यांनी निवासस्थानाची मागणी केल्यानंतर दोन महिन्यांचा कालावधी लोटला तरीही अद्याप कारवाई झालेली नाही.
Opposition Leader Ambadas Danve Home CM 10 Letters