रिस्पॉन्सिबल नेटिझम
‘रिस्पॉन्सिबल नेटिझम’ या संस्थेचे नाव ‘सायबर सिक्युरिटी’च्या क्षेत्रांमध्ये नवीन राहिलेले नाही. ही संस्था सुरू होऊन अजून एक दशकाची पूर्ण झाले नसले तरी या संस्थेने अल्पावधीतच किती महत्त्वाचे काम केले आहे ते आपल्याला कळू शकते. ‘सायबर सिक्युरिटी’ या विषयात या संस्थेने आतापर्यंत ११ लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले आहे. दोन हजारपेक्षा अधिक शैक्षणिक संस्थापर्यंत ते पोहोचले आहेत. पाच लाखापेक्षा अधिक पालकांशी संपर्क साधून ‘सायबर सिक्युरिटी’ विषयाबद्दल त्यांना मार्गदर्शन केले आहे. संस्था मुलांना मार्गदर्शन करतेच, पण पालकांना सजग करणे तेवढेच महत्वाचे आहे, हे ही संस्था मानते. पाच लाखापेक्षा अधिक शिक्षकांचे मार्गदर्शन करून ‘सायबर सिक्युरिटी’ संदर्भात त्यांना अधिक सजग केले आहे.
मुले / मुली त्यांच्या ऑनलाईन समस्या घेऊन ‘रिस्पॉन्सिबल नेटिझम’कडे येतात. अशा जवळपास तीस हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे समुपदेशन संस्थेच्या तज्ज्ञ लोकांनी केले आहे. ही सारी केवळ ‘आकडेवारी’ म्हणून सोडून देता येणार नाही, तर या संस्थेचे सातत्याने चालत असलेले काम (विशेषत: लहान मुले आणि महिला यांना इंटरनेटवर काम करत असताना) आपण सर्वाना संपूर्ण सुरक्षा कशी मिळेल याबद्दल विशेष महत्वाचे आहे. हे ‘ रिस्पॉन्सिबल नेटिझम’ चे वैशिष्ट्य राहिले आहे. स्वतःचा गाजावाजा न करता केवळ ‘सायबर सिक्युरिटी’ या विषयाला वाहून घेतलेली ही संस्था खरोखरच महत्त्वाचे काम करत आहे.
ही संस्था केवळ शाळा, पालक, विद्यार्थी यांच्यापर्यंत जाऊन थांबली नाही. देशाच्या पातळीवर सायबर सिक्युरिटीच्या संदर्भात काय काय बदल होऊ शकतात याच्या शिफारशी करून देशाच्या धोरणातच बदल घडवण्याचे प्रयत्न त्यांनी केले आहेत. राज्यसभेच्या एका समितीला त्यांनी या संदर्भातल्या शिफारशी दिल्या आहेत. महाराष्ट्र सायबर विभागाकडे त्यांनी ‘ऑनलाइन गेम रेटिंग’ च्या संदर्भात आपल्या शिफारसी दिल्या आहेत.
मुले ऑनलाईन गेम खेळात असतात. ते गेम त्यांच्या वयाला अनुसरून आहेत का, त्यांच्यात अतिरिक्त हिंसाचार, सेक्स आदींचा भरणा आहे का, गेम डाउनलोड करताना मुले आपला महत्वाचा डेटा देतात का या साऱ्या समस्यांबद्दल ‘रिस्पॉन्सिबल नेटिझम’ एक संस्था म्हणून काम करते. परंतु या क्षेत्रातले प्रश्न केवळ एका संस्थेच्या पातळीवर सोडवणे शक्य नाही तर ते देशाच्या धोरणाच्या कक्षेत आणून पूर्ण देशाला त्याचा फायदा झाला पाहिजे असा ‘रिस्पॉन्सिबल नेटिझम’चा नेहमीच आग्रह राहिला आहे. श्रीमती सोनाली पाटणकर आणि श्री उन्मेष जोशी यांनी ही संस्था सुरू केली, आता त्यांच्या इतर सहकाऱ्यांबरोबर ही संस्था वाढत आहे आणि देशपातळीवर एक प्रमुख संस्था म्हणून तिचे नाव घेतले जात आहे.
आपण स्थानिक पातळीवर न राहता राष्ट्रीय पातळीवर जाऊन सायबर सिक्युरिटी क्षेत्रांमध्ये काम केले पाहिजे ही जाणीव त्यांना आधीपासून होती. म्हणूनच त्यांनी २०१७ सालापासून राष्ट्रीय स्तरावर सायबर सायकॉलॉजी परिषद भरविण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यानुसार २०१७ मध्ये २० व २१ जानेवारीला मुंबईत पहिली परिषद भरवण्यात आली. या परिषदेची थीम होती Living Life 2.0: Coming together to Interface our Online and Offline Lives .
पुढच्या वर्षी म्हणजे २०१८ मधल्या परिषदेची थीम होती Building Cyber Hygiene Culture . मुंबईतच १८ – १९ जानेवारी २०१८ या तारखांना ही परिषद झाली. शैक्षणिक संस्थांमध्ये ‘सायबर हायजीन’ ही नवीन संकल्पना राबवून डिजिटल गार्डियन व डिजिटल पालक तयार करणे हा या परिषदेचा प्रमुख हेतू होता. तिसरी परिषद कोल्हापूर, औरंगाबाद आणि मुंबई अशा तीन ठिकाणी घेण्यात आली आणि त्याची थीम होती Child Online Protection आठ जानेवारीला कोल्हापूर, १८ जानेवारीला औरंगाबाद आणि २३ जानेवारी २०१९ ला मुंबईत मुख्य कार्यक्रम असे याचे स्वरूप होते.
मुलं बराच काळ ऑनलाईन असतात पण त्यापासून त्यांना कसे संरक्षण मिळेल या बाबत जनजागृती करण्याचे काम या परिषदेने केले. त्याचबरोबर सायबर सिक्युरिटी क्षेत्रामध्ये शिक्षण क्षेत्रातले तसेच अन्य प्रशिक्षक कसे तयार होतील आणि ते मुलांना कसे मार्गदर्शन करतील याकडे विशेष लक्ष देण्याचा या परिषदेने प्रयत्न केला. २०२० मध्ये ही परिषद पुन्हा एकदा Child Online Protection या विषयावर घेण्यात आली. ही परिषद मुंबईत न होता २३ व २४ जानेवारी २०२० रोजी पुण्यात घेण्यात आली.
या परिषदेचे उद्दिष्ट होते To build strong support systems and a network of professionals to handle online distress across the country . गेल्या वर्षीची म्हणजेच २०२१ ची परिषद Coping With Technology, New Education Policy And New Normal या विषयावर झाली.कोविडमुळे ऑनलाइन शिक्षण सुरू झाले होते आणि त्या त्यामुळे मुले अधिकाधिक ऑनलाइन राहत होती. यातून निर्माण होणारे प्रश्न, शैक्षणिक प्रश्न, मानसिक प्रश्न आणि इतर समस्या यांच्या संदर्भात मार्गदर्शनपर परिषद असे या परिषदेचे स्वरूप होते. पहिल्यांदाच ही परिषद ऑनलाईन झाली.
आधीच्या परिषदांची माहिती देण्याचा उद्देश एवढाच रिस्पॉन्सिबल नेटिझम येत्या शनिवारी म्हणजेच २२ जानेवारी २०२२ रोजी सहावी ‘राष्ट्रीय सायबर सायकॉलॉजी परिषद’ भरवत आहे. या परिषदेची थीम India Fights Cyber Violence against Women and Children अशी आहे. गेली चार वर्षे ही परिषद इतर विषयांबरोबरच लहान मुले व महिला यांची ऑनलाईन सुरक्षा या विषयाभोवती फिरत आहे, असे वाटेल, परंतु हेच चार वर्षांमधले सर्वात ज्वलंत प्रश्न आहेत आणि दिवसेंदिवस ते अधिक भयावह होत चालले आहेत हे रिस्पॉन्सिबल नेटिझम रोजच्या अनुभवावरून जाणते आहे. म्हणूनच आतापर्यंतच्या प्रत्येक परिषदेने ‘सायबर सिक्युरिटी’ च्या क्षेत्रांमध्ये भरीव काम केले असल्याने शनिवारची परिषद हा त्याच्या पुढचा अत्यंत महत्वाचा टप्पा असेल.
शनिवारच्या परिषदेत एनसीपीसीआर चे अध्यक्ष श्री प्रियांका कानुंगो यांचे प्रमुख भाषण आपल्याला ऐकता येईल त्याच बरोबर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे महासंचालक श्री सत्यनारायण प्रसाद यांचे Internet Radicalization a global perspective या विषयावर मार्गदर्शन होईल. महाराष्ट्र राज्याचे मंत्री सतेज पाटील यांचा रिस्पॉन्सिबल नेटिझमला नेहमीच पाठिंबा राहिला आहे. या विषयावर सरकारी धोरणात कसा सकारात्मक बदल होईल या विषयी ते प्रयत्नशील असतात. तेही या परिषदेत भाग घेत आहेत. त्याशिवाय संस्थेचे एक आधारस्तंभ खा. विनय सहस्रबुद्धे हेही या परिषदेला आवर्जून उपस्थित असतील. विविध विषयांवरील परिसंवाद आणि त्यात तज्ज्ञ मंडळींचे मार्गदर्शन हे या परिषदेचे वैशिष्ट्य राहिले आहे. म्हणूनच तो तपशील शेवटी सविस्तर देत आहे.
या परिषदेला हजर राहणे हे पालक, शिक्षक, महिला ,मुले याना गरजेचे आहे असे मला वाटते. प्रत्येक परिषदेनंतर संस्थेला पुढची दिशा जशी कळते तशीच जाणीव पालक, शिक्षक, मुले, महिला आणि एकूणच समाज यांनाही होते. ती झाली तरच ते या विषयातले महत्वाचे पुढचे पाऊल असेल यात शंका नाही.
Contact Responsible Netism
WhatsApp: +91 8433701077
Email: [email protected]