नाशिक- ‘मिसेस वेस्ट इंडिया – एम्प्रेस ऑफ वेस्ट इंडिया २०२२ सीझन ४ या सौंदर्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत ‘विनर मिसेस वेस्ट इंडिया २०२२ च्या सिल्व्हर कॅटॅगरीचे विजेतेपद नाशिकच्या नीलाक्षी लोही ह्या सौंदर्यवतीने पटकविले आहे. तसेच सौंदर्य व बुद्धिमत्तेचा संगम असलेल्या नीलाक्षीने याच स्पर्धेत ‘मिसेस कॉन्फिडंट २०२२ – सिल्व्हर कॅटॅगरी’ बहुमानाचा मुकूटही पटकवला आहे पुण्यातील हॉटेल हयात येथे झालेल्या या सौंदर्यस्पर्धेत नीलाक्षी यांना सन्मानित करण्यात आले आहे.
‘दिवा पेजंट्स ही संस्था विवाहित महिलांसाठी त्यांच्या गुणसामर्थ्याचा आविष्कार घडवण्याचा आणि इतरांना अशक्य वाटणारे साध्य करण्याचा सुप्रतिष्ठित व सुरक्षित मंच उपलब्ध करून देते .ठरवून गृहिणीपद पत्करलेल्या आणि वन्यजीवन छायाचित्रणाचा छंद जोपासणाऱ्या नीलाक्षी ह्यांना प्रतिष्ठेच्या सौंदर्य स्पर्धेत उतरण्याचे धाडस करणे तितकेसे सोपे नव्हते. नीलाक्षी ह्यांना स्वयंपाक व बेकरी उत्पादने बनवण्याखेरीज व्हायोलिन वाजवण्याचा आणि वन्यजीवन छायाचित्रणाचाही छंद आहे. जगातील प्रत्येकाला समजणारी वैश्विक भाषा असलेल्या छायाचित्रणावर नीलाक्षी उत्कटतेने प्रेम करतात वास्तविक छायाचित्रणाच्याच या आकांक्षेनेच नीलाक्षी ह्यांना तंदुरुस्तीप्रेमी बनवले आहे. नीलाक्षी यांनी नियमित व्यायामाने २० किलो वजनही कमी केले आहे .
आपल्या अनुभवाबद्दल नीलाक्षी लोही म्हणाल्या की ‘स्काय इज द लिमिट’ पण मी माझे पाऊल चंद्रावर रोवले आणि ताऱ्यांमध्ये माझे स्थान निर्माण केले तर तेच आकाश माझ्यासाठी मर्यादा न ठरता प्रारंभ असेल. माझा खरोखर विश्वास आहे, की आम्ही स्त्रिया म्हणून जे काही साध्य करु शकतो त्याला मर्यादा नाही. माझी सर्वांत मोठी कामगिरी म्हणजे समूहासमोर मंचावर जाण्याच्या भीतीवर केलेली मात होती. इतक्या प्रचंड संख्येच्या जनसमुदायापुढे बोलण्याची मला भीती वाटत होती आणि मला ते आव्हान पेलायचेही होते.
त्या पुढे म्हणाल्या “या प्रतिष्ठित मंचावर माझे नाव विजेतेपदासाठी जाहीर केले गेले तो क्षण खरोखर भारावून टाकणारा होता. ही स्पर्धा संपूर्ण समर्पित भावनेने लढवण्याचे धैर्य माझ्यात होते आणि मी उदार अंतःकरणाने, निर्भय मनाने आणि धाडसी भावनेने माझ्यातील गुणांचा आविष्कार घडवला त्यामुळेच मी हा बहुमान जिंकण्यास लायक ठरले. मी माझ्यासाठी भक्कम शक्तिस्तंभ असलेले माझे पती श्याम लोही यांनाही धन्यवाद देते. त्यांच्याच पाठिंब्यामुळे मी या सौंदर्य स्पर्धेत उतरण्याचे धाडस करु शकले. ‘दिवा पेजंट्स’ची संकल्पना साकारणारे आणि स्पर्धेसाठी माझी तयारी करुन घेणारे अंजना व कार्ल मस्कारेन्हास यांच्याबाबतही मी अत्यंत कृतज्ञ आहे कारण त्यांनी मला सतत प्रोत्साहन दिले, मी ही कामगिरी करु शकते, असा विश्वास दिला आणि काहीही झाले तरी स्वप्नांचा पाठपुरावा कसा करायचा याचा मार्गही दाखवला. त्यांचे खूप आभार. त्यांनी केलेले समर्पित मार्गदर्शन व अचूक जडण-घडण यामुळे खरोखर प्रत्येक स्पर्धकाचे विजेत्यात रुपांतर झाले.”