नाशिक – नाशिक शहर महानगरपालिका क्षेत्रातील कार्यरत असलेल्या महाविद्यालयांमध्ये इयत्ता १२ वी नंतर पुढील शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी पंडीत दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे, आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नाशिकच्या प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी वर्षा मिना यांनी शासकीय प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.
सदर योजना विभागीय व जिल्हा स्तरावर अनुसूचित जमातीच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी आदिवासी विभागाद्वारे सन २०१६-१७ पासून सुरू केली आहे. या योजनेंतर्गत इयत्ता १२ वी नंतरच्या शिक्षणासाठी भोजन, निवास, व शैक्षणिक साहित्यासाठी थेट रक्के त्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यात वर्ग करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी htttp://swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर अर्ज सादर करावयाचे आहेत. नवीन विद्यार्थ्यांनी संकतेस्थळावर अर्ज भरतांना प्रथम नोंदणी करून, युजर आडी व पासवर्ड यांचा वापर करून व योग्य पर्याय निवडून अर्ज भरावा. जे विद्यार्थी सन २०२०-२१ पासुन या योजनेत प्रवेशित आहेत, त्यांनी सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी अर्ज भरतांना Renew Application पर्यायाचा उपयोग करणे आवश्यक आहे.
*अर्ज भरतांना खालील अटी व शर्तींची पूर्तता करणे आवश्यक आहे*
•विद्यार्थिनी व विद्यार्थी हे अनुसूचित जमातीचे असावेत.
•विद्यार्थ्यांकडे जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. (व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडे जात पडताळणी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.)
•विद्यार्थ्यांच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा २.५० लक्षच्या आत असणे आवश्यक आहे.
•विद्यार्थ्यांचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे बंधनकारक आहे व सदरचे खाते आधार क्रमांकाशी संलग्न असावे.
•विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या ठिकाणी आहे, अशा शहरातील सदर विद्यार्थ्यांचे पालक रहिवाशी नसावेत.
•सदर विद्यार्थी इयत्ता-१२ वी नंतर उच्च शिक्षण घेत असावा. एका विद्यार्थ्यास जास्तीत जास्त ७ वर्षे सदर योजनेचा लाभ घेता येईल.
•विद्यार्थ्यांचे कमाल वय २८ वर्षापेक्षा जास्त नसावे.
•आदिम जमातीच्या व अनुसूचित जमातीच्या अपंग विद्यार्थ्यांना सदर योजनेचा लाभ प्राथम्याने देय राहील.
•विभागीय शहर महानगरपालिका व जिल्हा स्तरावर कार्यरत संस्था किंवा महाविद्यालयामध्ये प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांनी मान्यताप्राप्त महाविद्यालय किंवा संस्थेमध्ये व मान्यताप्राप्त अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला असावा. तसेच तालुकास्तरावर मान्यताप्राप्त तंत्रशिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाच्या शासकीय तसेच अनुदानित महाविद्यालयामध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रीयेद्वारे प्रवेश घेणे आवश्यक आहे.
•विद्यार्थ्याने आदिवासी विकास विभागाच्या संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन अर्ज करणे बंधनकारक राहील. अभ्यासक्रमाचा निकाल लागल्यापासून विद्यार्थ्यांनी एक महिन्याच्या आत ऑनलाईन प्रणालीमध्ये अर्ज भरावा.
•विद्यार्थ्यास आदिवासी विकास विभागाच्या, सामाजिक न्याय विभागाच्या किंवा संबंधीत शैक्षणिक संस्थेच्या वसतिगृहामध्ये मोफत प्रवेश मिळालेला नसावा.
•विद्यार्थी कोणत्याही प्रकारची नोकरी किंवा व्यवसाय करत नसावा.
•एका शाखेची पदवी मध्येच सोडून दुस-या शाखेची पदवीसाठी प्रवेश घेतल्यास किंवा एका शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर इतर शाखेच्या पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतल्यास सदर योजनेचा लाभ मिळणार नाही.
•केंद्र शासनाच्या पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्ती करीता निश्चित करण्यात आलेल्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सदर योजनेंतर्गत लाभ देण्यात येईल. तथापि दोन वर्षापक्षा कमी कालावधीच्या अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ मिळणार नाही.
•आदिवासी विकास विभागाच्या २७ नोव्हेंबर २०१८ च्या शासन निर्णयान्वये सदर योजनेचा लाभ विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट वर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थी व शैक्षणिक संस्थांनी फसवणूक केल्याचे आढळल्यास संबंधीत विद्यार्थी व शैक्षणिक संस्था व्याजासह वसुलीस व कायदेशिर कारवाईस पात्र राहतील.
असेही एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नाशिकच्या प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी वर्षा मिना यांनी शासकीय प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.