मुंबई – राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे जेव्हा काही तरी वक्तव्य करतात तेव्हा त्यामागे ठोस कारणे असू शकतात असे मानले जाते. त्यासंदर्भात वेगवेगळी मते-मतांतरे असतात. त्यांच्या वक्तव्याला सगळेच राजकीय पक्ष गंभीरतेने घेत असतात. आता अनेक दिवसांपासून राज्यासह देशभरात गाजत असलेल्या १०० कोटी रुपयांच्या वसुलीच्या प्रकरणाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रथमच खुलेपणाने प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार म्हणाले की, या प्रकरणातील आरोप करणारे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह बेपत्ता झाले आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप लावल्यापासून ते बेपत्ता झाले आहे. ते आरोप सिद्ध करण्यासाठी ते समोर येत नाही. परमबीर सिंह फरारी आहेत आणि अनिल देशमुख कारागृहात आहेत. तुम्ही जे काही कृत्य केले आहे, त्याची किंमत चुकवावी लागेल, असे सांगत पवार यांनी भाजपवर हल्लाबोल केला. शरद पवार यांनी प्रथमच अनिल देशमुख यांची खुलेपणाने पाठराखण करत देशमुख यांच्यासोबत अन्याय झाल्याचे म्हटले आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात अनिल देशमुख न्यायालयीन कोठडीत आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने त्यांना अटक केली होती.
यादरम्यान शरद पवार यांनी राष्ट्रीय राजकारणात भाजपला पर्याय काय, याबद्दलही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, आगामी सार्वत्रिक निवडणुकीत भाजपविरोधी तिसऱ्या आघाडीचे नेतृत्व कोण करेल हे आमच्यासाठी महत्त्वाचे नाही. भाजपशी सामना करण्यासाठी नागरिकांच्या अपेक्षेनुसार नेतृत्व देणे महत्त्वाचे आहे. याबद्दल चिंतन करणे गरजेचे आहे.
आगामी लोकसभेच्या निवडणुकीत तिसर्या आघाडीचे नेतृत्व ममता बॅनर्जी करू शकतात का, या प्रश्नावर ते म्हणाले, की आगामी संसदेच्या अधिवेशनात याबद्दल चर्चा केली जाईल. याच वर्षी जूनमध्ये शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, आम आदमी पक्ष, राष्ट्रीय लोकदल, डाव्या पक्षांसह ८ पक्षांना निमंत्रण दिले होते. त्यावरून शरद पवार तिसऱ्या आघाडीचे नेतृत्व करण्याचा विचार करत असल्याचे कयास लावण्यात आले होते.