नाशिक(इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिक मध्ये पन्नास हजार हून अधिक बंगाली परिवार राहत असून त्यांना त्यांचे मूळ गाव कोलकत्ता तसेच पश्चिम बंगालमधील विविध शहरांना जाण्यासाठी नाशिक ते कोलकत्ता अशी थेट हवाई सेवा सुरू करावी तसेच मुंबई कोलकता दुरांतो एक्सप्रेसला नाशिकमध्ये थांबा द्यावा अशा विनंतीचे निवेदन बंगाली अड्डा या बंगाली समाजाच्या नाशिक मधील संस्थेतर्फे खा राजाभाऊ वाजे यांना देण्यात आले.
याबाबत अधिक माहिती देताना बंगाली अड्डा चे अध्यक्ष डॉ संदीप रॉय म्हणाले की नाशिकहून कोलकत्ता ला जाण्यासाठी थेट हवाईसेवा असावी अशा विनंती इंडिगो व एअर इंडिया या विमान कंपन्यांना याआधी करण्यात आली आहे .या विनंती वर इंडिगो आणि एयर इंडिया सकारात्मक असून लवकरच ही हवाई सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. तश्या प्रकारचा मेल देखील या विमान कंपन्यां कडून आला आहे.
यासोबतच मुंबईहून कोलकत्ता ला जाण्यासाठी दुरांतो की जलद रेल्वे आहे .सध्या दुरांतो एक्सप्रेस ला नाशिक येथे थांबा नाही. हा थांबा असल्यास अनेकांची सोय होईल तसेच नाशिकहून कोलकत्ता , नागपूर ,रायपूर येथे जाण्यासाठी अजून एक रेल्वे उपलब्ध होईल. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या सेवा सुरू झाल्यास लाखो भाविक तर नाशिक मध्ये येतीलच सोबतच दोन्ही शहरां मधील
व्यवसाय देखील वाढीस लागेल असेही डॉ .संदीप रॉय यांनी नमूद केले.नाशिक ते कोलकत्ता हवाई तसेच रेल्वे मार्गाने प्रभावीपणे जोडण्यासाठी नाशिकचे खा राजाभाऊ वाजे यांना दिलेल्या निवेदनास खा.वाजे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचेही डॉ रॉय यांनी सांगितले. निवेदन देताना बंगाली अड्डा तर्फे सौमित्र मुखर्जी, मृदूल देब व सुरजीत सेनगुप्ता देखील उपस्थित होते.