नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – झारखंडमधील त्रिकूट हिल्स रोपवेच्या दुर्घटनेत बचाव मोहिमेचे नेतृत्व करणारे आणि मूळचे नाशिकचे असलेले ग्रुप कॅप्टन योगेश्वर कांदळकर यांना शौर्यचक्र जाहीर करण्यात आले आहे. ७४ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपतींनी शौर्य चक्र ग्रुप कॅप्टन योगेश्वर के कांदळकर यांना जाहीर केले. कांदळकर यांनी ३५ जणांचा जीव वाचविला होता. या बचाव ऑपरेशनमध्ये दाखवलेल्या अपवादात्मक धैर्याबद्दल आणि नेतृत्वाबद्दल त्यांना शौर्य चक्राने सन्मानित करण्यात येणार आहे.
१० एप्रिल २०२२ रोजी संध्याकाळी ४८ यात्रेकरू त्रिकुट रोपवे मार्गात अडकले होते. इतर सर्व प्रयत्न अयशस्वी झाल्यावर भारतीय वायुदलाला पाचारण करण्यात आले. या मोहिमेचे नेतृत्व ग्रुप कॅप्टन कांदळकर यांच्याकडे देण्यात आले. Mi17 V5 हेलिकॉप्टरमधून हवाई दलाने ३५ जणांची यशस्वीरित्या सुटका केली. हेलिकॉप्टरद्वारे हाती घेतलेल्या सर्वात धाडसी बचावांपैकी ही एक मोहिम होती.
ग्रुप कॅप्टन कांदळकर हे नाशिकमध्ये जन्मलेले आणि वाढलेले आहेत. ओझर टाऊनशिप नाशिकमधील जीईएस एचएएल हायस्कूलमध्ये त्यांनी प्राथमिक शिक्षण घेले. त्यानंतर त्यांनी औरंगाबाद येथून पुढील शिक्षण घेतले. ते एक प्रतिष्ठित हेलिकॉप्टर पायलट आणि एक पात्र फ्लाइंग इंस्ट्रक्टर आहेत. प्रतिष्ठित राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचेही ते माजी विद्यार्थी आहेत.
Nashik Group Captain Yogeshwar Kandalkar Shaurya Chakra