नाशिक – प्रभाग २४ (नवीन ३०) मध्ये मुख्य व अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात चिखल झाला असून, मातीचे ढीगही साचले आहेत, याचा नागरिकांना त्रास होत आहे. ते त्वरित हटवावेत, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व सत्कार्य फाउंडेशनने महापालिकेकडे केली आहे. ही कार्यवाही त्वरित न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
पावसामुळे गोविंदनगर, बडदेनगर, तिडकेनगर, कर्मयोगीनगर, खोडे मळा, भुजबळ फार्म परिसर या भागात रस्त्याच्या कडेला व रस्त्यावर ठिकठिकाणी मातीचे ढीग आहेत, चिखलही आहे. फुटलेल्या वीटा, दगड, खडी, जुन्या बांधकामाचे भंगार साहित्य, मैला याचे ठिकठिकाणी ढीग आहेत. यामुळे सर्वत्र अस्वच्छता निर्माण झाली आहे. हे सर्व हटवावे, अशी मागणी महापालिका शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांच्याकडे करण्यात आली आहे. याच भागात ठिकठिकाणी मोठमोठी बांधकामे सुरू आहेत. येथे ये-जा करणार्या अवजड वाहनांमुळे चांगले रस्ते खराब होत आहेत. बांधकाम व्यावसायिकांचा निष्काळजीपणा, दुर्लक्षही वरील परिस्थितीला कारणीभूत आहे. यामुळे सर्वच नागरिकांना विशेषत: दुचाकीस्वार, पादचारी व ज्येष्ठ नागरिक यांना जास्त त्रास सहन करावा लागत आहे. वाहने घसरूनही अपघात होण्याची शक्यता आहे. जनहितार्थ हा गाळ व माती हटविण्याचे आदेश संबंधित बांधकाम व्यावसायिकांना द्यावेत, या मागणीचे निवेदन नगररचनाचे कार्यकारी अभियंता संजय अग्रवाल यांना देण्यात आले आहे.
या दोन्ही विभागांनी ही कार्यवाही न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, धवल खैरनार, संगिता देशमुख, प्रभाकर खैरनार, रवींद्र सोनजे, वंदना पाटील, सुनीता उबाळे, मीना टकले, रुपाली मुसळे, विनोद पोळ, मनोज पाटील, बाळासाहेब राऊतराय, संध्या-छाया ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विठ्ठल देवरे, गोविंदनगर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष भालचंद्र रत्नपारखी, बाळासाहेब देशमुख, दिलीप जगताप, डॉ. शशीकांत मोरे, डॉ. राजाराम चोपडे, बापुराव पाटील, दिलीप निकम, मगन तलवार, दीपक दुट्टे आदींसह नागरिकांनी दिला आहे.