नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हिरावाडीत टोळक्याने घरात घुसून दांम्पत्यास बेदम मारहाण केल्याची घटना घडली. जमिनीच्या वादातून कोर्टाची नोटीस पाठवल्याचा राग मनात धरुन ही मारहाण करण्यात आली. या घटनेत टोळक्याने पतीस डांबून ठेवत पत्नीस चारचाकीतून तिच्या माहेरी घेवून जात मारहाण करण्यात आली. याप्रकरणी मिराबाई अरूणसिंग राजपूत (५० रा.अश्रयन अपा.गुंजाळ बाबानगर,हिरावाडी) यांनी तक्रार दाखल केली असून पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनाजी दामू भगत, ज्ञानेश्वर दामू भगत,योगेश रामदास भगत,विशाल ज्ञानेश्वर भगत, तारा रामदास भगत, जया नाना भगत,मनिषा संतोष भगत,भाचा बाळू व त्याची पत्नी (रा.मुळे गाव ता.त्र्यंबकेश्वर) अशी दांम्पत्यास मारहाणा करणा-या संशयित टोळक्याची नावे आहेत. राजपूत व भगत कुटुंबियात शेत जमिनीचा वाद आहे. याबाबत राजपूत यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. कोर्टाने संशयितांना नोटीस बजावल्याने ही घटना घडली. राजपूत दांम्पत्य शुक्रवारी (दि.१३) दुपारच्या सुमारास आपल्या घरी असतांना चारचाकीमधून आलेल्या संशयितांनी त्यांचे घर गाठून कोर्टाच्या नोटीसीबाबत जाब विचारला. यावेळी संतप्त टोळक्याने महिलेसह तिच्या पतीस शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता या टोळक्याने महिलेच्या पतीचा मोबाईल हिसकावून घेत त्यास किचन मध्ये ओढत नेऊन दरवाजा बंद करीत डांबून ठेवले. यानंतर महिलेस बळजबरीने घराबाहेर ओढत नेवून चारचाकीतून तिला माहेर असलेल्या माळेगाव ता.त्र्यंबकेश्वर येथे नेण्यात आले. याप्रसंगी वाहनात व माहेर असलेल्या मुळे गाव येथे घेवून जात टोळक्याने तिला मारहाण केली. महिलेने संशयितांच्या ताब्यातून कशी बशी सुटका करून घेत पंचवटी पोलिस ठाणे गाठून आपबिती कथन केली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक माळी करीत आहेत.