नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –औरंगाबाद रोडवरील जयशंकर लॉन्स येथे वर पक्षाचा हळदीचा कार्यक्रम आटोपून बफे जेवण करणा-या महिलेची पर्स चोरट्यांनी लंपास केली. या पर्समध्ये आहेराची रक्कम, मोबाईल व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे साडे तीन लाखाचा ऐवज होता. ही चोरीची घटना सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाली असून पोलिस चोरट्यांचा शोध पोलिस घेत आहेत. कल्याणी राहूल गाडे (रा.सांताक्रुझ पुर्व मुंबई) या महिलेने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. गाडे यांच्या भावाचा विवाह सोमवारी (दि.५) जेजूरकर मळा येथील जयशंकर लॉन्स येथे गोरस मुहूर्तावर पार पडला. सायंकाळच्या सुमारास वर पक्षाच्या हळदीचा कार्यक्रम आटोपून व-हाडी मंडळी बरोबर गाडेही आपल्या आई आणि मावशीला सोबत घेवून जेवणासाठी लॉन्स मध्ये गेल्या होत्या. आई आणि मावशी बसलेल्या ठिकाणी दुस-या खुर्चीवर पर्स ठेवून त्या जेवणाचे ताट घेण्यासाठी गेल्या असता ही घटना घडली. दोघी बहिणी गप्पा मारत असतांना अज्ञात चोरट्याने पर्स चोरून नेली. या पर्स मध्ये आहेरात आलेली आठ हजाराची रोकड, सोन्याचांदीचे दागिणे व मोबाईल असा सुमारे ३ लाख ३० हजार रूपये किमतीचा ऐवज होता. ही बाब आई आणि मावशीस जेवण घेवून आलेल्या गाडे यांच्या निदर्शनास आली. सर्वत्र शोध घेवूनही पर्स हाती न लागल्याने अखेर लॉन्स मधील सीसीटिव्ही यंत्रणेची पाहणी करण्यात आली असता, चोरीचा हा प्रकार समोर आला. १८ ते २५ वयोगटातील पांढरा शर्ट परिधान केलेल्या व्यक्तीने पर्स उचलून पोबारा केल्याचे निदर्शनास येताच गाडे यांनी पोलिसात धाव घेतली. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक पाथरे करीत आहेत.