नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– शहर परिसरात वेगवेगळया ठिकाणी झालेल्या दुचाकी अपघातांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला. त्यात २० वर्षीय कामगारासह १६ वर्षीय विद्यार्थीनीचा समावेश आहे. याप्रकरणी सातपूर आणि आडगाव पोलीस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार औद्योगीक वसाहतीतील अशोकनगर भागात राहणारा मयुर नरेद्र पाटील (२० रा. भाजीमार्केट जवळ,अशोकनगर) हा युवा कामगार गेल्या गुरूवारी (दि.२२) सकाळच्या सुमारास महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीतून रात्र पाळीची सेवा बजावून आपल्या दुचाकीवर घराकडे जात असतांना हा अपघात झाला होता. एमएच १८ सीसी ८३२१ या दुचाकीने तो आपल्या घराकडे जात असतांना कार्बन नाक्याकडून सातपूरच्या दिशेने भरधाव जाणा-या एमएच १५ एचएच ६२८५ या खासगी प्रवासी बसने दुचाकीस धडक दिली. या घटनेत दुचाकीस्वार मयुर पाटील याचा मृत्यू झाला असून याप्रकरणी वडिल नरेंद्र पाटील यानी दिलेल्या तक्रारीवरून पसार झालेल्या बसचालकाविरोधात सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक नळकांडे करीत आहेत.
दुसरी घटना महामार्गावरील मनू मदिर परिसरात घडली. या अपघातात जगदिश भटू कारंकाळ (३८ रा.वास्तू अपा. अंजना लॉन्स मागे दामोदर नगर) यांचा मृत्यू झाला. लष्करातून निवृत्त झालेले कारंकाळ हे सुरक्षा रक्षक पदावर एका कंपनीत कार्यरत होते. रविवारी (दि.२५) दुपारी ते आपली सेवा बजावून महामार्गावरून दुचाकीने घराकडे जात असतांना हा अपघात झाला. मनू मंदिराच्या समोर भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीस पाठीमागून धडक दिल्याने ते जखमी झाले होते. १०८ अॅम्ब्युलन्सच्या माध्यमातून त्यांना जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले.
तर अनुष्का शांताराम निमसे (१६ रा.वरवंडीरोड नांदूर पो. माडसांगवी ता.जि.नाशिक) ही विद्यार्थीनी गेल्या गुरूवारी (दि.२२) सायंकाळच्या सुमारास शिकवणीवरून आपल्या दुचाकीने घराकडे जात असतांना अपघात झाला. जत्रा हॉटेलकडून नांदूर नाक्याच्या दिशेने ती प्रवास करीत असतांना शिवकृपा स्विटस या दुकानासमोर अज्ञात चारचाकी वाहनाने दुचाकीस धडक दिली. या अपघातात अनुष्का गंभीर जखमी झाल्याने तिला प्रथम नजीकच्या जगदंब हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. प्रथमोपचारानंतर तिला अशोका हॉस्पिटल येथे हलविण्यात आले असता उपचार सुरू असतांना रविवारी (दि.२५) डॉ. शेखर चिरमाडे यांनी तपासून तिला मृत घोषीत केले. वरिल दोन्ही घटनांबाबत आडगाव पोलीस ठाण्यात वेगवेगळय़ा मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या असून अधिक तपास हवालदार अहिरे व बनकर करीत आहेत.