नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – समृद्धी महामार्गाचे काम वेगाने सुरू आहे. सध्या नागपूर ते शिर्डी एवढा ५३० किलोमीटरचा टप्पा पूर्ण झाला आहे. डिसेंबरमध्ये तो लोकांच्या सेवेतही दाखल करण्यात आला. पुढचे कामही वेगाने सुरू आहे. येत्या काही दिवसांत नियोजनाप्रमाणे काम झाल्यास मार्च किंवा जूनपासून नागपूर ते नाशिक अंतरही साडेपाच तासांत पूर्ण करता येणार आहे.
समृद्धी महामार्ग सुरू झाल्यानंतर सर्वसामान्य जनतेने त्याला चांगला प्रतिसाद दिला. अर्थात काही दुर्दैवी अपघातही झाले. पण आता काळजी घेतली जात आहे. सध्या नागपूरहून शिर्डी केवळ पाच तासात गाठणे शक्य होत आहे. पण मार्चमध्ये शिर्डी ते भरवीर हा ८० किलोमीटरचा टप्पा पूर्ण झाल्यास नागपूर ते नाशिक अंतर साडेपाच तासांत गाठणे शक्य होईल. समृद्धी महामार्गावरून ताशी १२० किलोमीटरच्या वेगाने गाडी पळवता येते. त्यामुळे तसेही लोक या महामार्गाचा पूर्ण लाभ घेत आहेत. मार्चमध्ये शिर्डी ते भरवीर हा टप्पाही लोकांच्या सेवेत दाखल करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी दिली आहे.
इगतपुरीपर्यंत लवकरच
समृद्धी महामार्ग सध्या शिर्डीपर्यंत असला तरीही मार्चपर्यंत भरवीरमध्ये दाखल होईल आणि जूनपर्यंत इगतपुरीपर्यंतचे कामही सुरू करण्यात येईल, असे नियोजन करण्यात आल्याचे एमएसआरडीसीने म्हटले आहे. भरवीरपर्यंतचे काम पूर्ण झाल्यावर हे काम सुरू करण्याचे नियोजन आहे, असेही ते म्हणाले. इगतपुरी समृद्धी महामार्गाचे बांधकाम एमएसआरडीसीच्या माध्यमातून होत आहे.
मुंबईची प्रतिक्षा
नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाची लोकांना विशेष प्रतिक्षा आहे. अर्थात सध्या मोठा टप्पा पूर्ण झालेला असला तरीही मुंबईपर्यंत कधी पूर्ण होईल, याची उत्सुकता लागली आहे. कारण नागपूर ते मुंबई अंतर केवळ आठ तासांत पूर्ण करता येणार आहे.
Nagpur to Nashik Travel time only 5 hours 30 minutes