मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई शहरात महापालिकेच्या विविध ठिकाणी असलेल्या ६८ जागांवर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प (झोपू) उभा करण्यात येणार आहे. मात्र या फाइली एकत्र तपासण्यास तुमचा आक्षेप का? असा सवाल करीत हायकोर्टाने भाजप नेते किरीट सोमाय्या यांना चांगलेच फटकारले आहे. मात्र त्यानंतर सोमय्या यांनी माझा विरोध नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
मुंबई महानगरात महापालिकेकडून प्रस्तावित असलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासंबंधी अर्थ या सामाजिक संघटनेने हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यामुळे या सर्व प्रकल्पातील ६८ फायलींची एकत्रितपणे तपासणी करण्यात येणार होती. मात्र दुसरी किरीट सोमय्या यांनी झोपू योजनेतील ६८ फाईलींची एकत्रित पाहणीला प्रारंभी विरोध केला होता, या पार्श्वभूमीवर हायकोर्टाच्या खंडपीठात मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्यापुढे सुनावणी झाली. त्यावेळी सोमय्या यांना सुनावणी वेळी खंडपीठाने आपली बाजू मांडण्यास सांगितले होते.
हायकोर्टात उत्तर देण्यास शेवटची संधी असल्याचेही स्पष्ट केले होते, कारण याचिकाकर्त्या अर्थ संघटनेने रीट याचिकेद्वारे झोपू योजनेतील अनियमित्ता कोर्टाच्या निदर्शनास आणून दिल्याने आम्ही रिट याचिकेचे जनहित याचिकेत रूपांतर करून घेतले असून त्या संदर्भात आता चौकशी सुरू असल्याचे हायकोर्टाने स्पष्ट केले. दरम्यान, या फायली तपासण्याचे आदेश तत्कालीन गृहमंत्र्यांनी दिले होते. मात्र, सन २०२० मध्ये झोपूने ही मागणी रद्द करण्याची विनंती गृहमंत्र्यांना केली. तर ही पाहणी तथा चौकशी रद्द करण्याची मागणी सोमय्या यांनी केली. तसेच या प्रकरणाशी तुमचा नेमका संबंध काय असा प्रश्न सोमय्या यांना हायकोर्टाने विचारला असून या योजनेच्या फायलींचे एकत्रित तपासणी करण्यात येणार आहे त्याला तुमचा आक्षेप का आहे ?असाही प्रश्न विचारला असता सोमय्या यांनी आता माझा विरोध नसल्याचे स्पष्ट केले आहे अशाप्रकारे यू टर्न घेतल्याने सोमय्या यांच्या या भूमिकेबद्दल उलट सुलट चर्चा सुरू आहे
महापालिका निवडणूकीचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून किरीट सोमय्यांनी एक ना अनेक घोटाळे, गैरव्यवहार, कामकाजातल्या अनियमितता आदि नागरिकांचे प्रश्न रेटले. परिणामी शिवसेनेची सत्ता असलेल्या महापालिकेत भाजपने पूर्वीच्या तुलनेत चांगली कामगिरी केली, असे म्हटले जाते. शिवाय, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे आर्थिक अपहार समोर आणण्यातही किरिट सोमय्या यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे.
सोमय्या यांनी ‘युवक प्रतिष्ठान’ची स्थापना केली असून गेल्या ३० वर्षांपासून या प्रतिष्ठानच्या माध्यमातून झोपडपट्टीधारक पुनर्वसन, आरोग्यसेवा कमी किंमतीला उपलब्ध करून देणे, शिक्षण आणि खेळ यांच्याविषयी जागरुकता निर्माण करण्याचे काम करण्यात येत आहे, मात्र, तरीही त्यांना विश्वासार्हता कमावता आली नाही. बरेचदा सोमय्या आर्थिक घोटाळा पुढे आणतात आणि मग अचानक त्यावर बोलणे बंद करतात. पण, एखादा मुद्दा मांडल्यावर ते अचानक तो मुद्दा मागे का घेतात किंवा त्याचा पाठपुरावा का करत नाहीत, किंवा युटर्न का घेतात? असा प्रश्न आता विचारला जात आहे.
Mumbai High Court Slams to BJP Leader Kirit Somaiyya