नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रधानमंत्री मुद्रा योजनेने केलेल्या रोजगार निर्मितीचे मूल्यांकन करण्यासाठी श्रम आणि रोजगार मंत्रालयाने (MoLE) मोठ्या प्रमाणावर केलेल्या राष्ट्रीय स्तरावरच्या नमुना सर्वेक्षणाच्या निष्कर्षावरून असे निदर्शनाला आले आहे की प्रधानमंत्री मुद्रा योजनेमुळे २०१५ ते २०१८ या तीन वर्षांच्या काळात १ कोटी १२ लाख निव्वळ अतिरिक्त रोजगार निर्माण करण्यात मदत झाली. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत किसनराव कराड यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
गेल्या तीन आर्थिक वर्षांमध्ये राजस्थान मध्ये वितरण केलेल्या एकूण ८१ लाख कर्जांपैकी ५२ लाखांपेक्षा अधिक कर्ज महिला उद्योजिकांना वितरीत करण्यात आली ही रक्कम महिलांना दिलेल्या कर्जाच्या ६४ टक्के इतकी आहे, असे त्यांनी सांगितले. प्रधान मंत्री मुद्रा योजनेच्या अंमलबजावणीशी संबंधित कोणत्याही बाबीचे, टर्न-अराउंड-टाइम (TAT)म्हणजे कार्यवाही पूर्ण होण्यासाठी लागणारा कालावधी, कर्जाचे अर्ज नाकारणे आणि काही प्रसंगी तारण/ हमीदाराचा आग्रह यासह संबंधित बँकांशी समन्वय साधून निराकरण केले जाते, असे मंत्री म्हणाले. या योजनेचा आढावा वेळोवेळी घेतला जातो असेही त्यांनी सांगितले.