मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एसटी म्हणजे महाराष्ट्राच्या लालपरीची एखाद्या मार्गावरील एक फेरी कमी झाली तरी कित्येकांचा हिरमोड होतो. अश्यात एखाद्या मार्गावरून यापुढे लालपरी धावणारच नाही, असे सांगण्यात आले तर काय होईल. प्रशासनाने सध्या एका मार्गाच्या बाबतीत असाच निर्णय घेतलेला आहे. आणि त्यामुळे सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागणार आहे.
राज्य परिवहन महामंडळाने मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे वर यापुढे लालपरी धावणार नाही, असा निर्णय घेतला आहे. मुळात या मार्गावर अनेक खासगी वाहने धावतात. पण लालपरी ही सर्वसामान्यांसाठी आर्थिकदृष्ट्या अत्यंत सोयीची मानली जाते. त्यामुळे या मार्गावर एसटीच्या फेऱ्या बंद होणार म्हटल्यावर सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावण्याचाच प्रयत्न आहे. मुळात साध्या बसेस या मार्गाने सोडणे एसटीसाठी खर्चिक ठरत आहे. त्यामुळे यापुढे राज्य परिवहन महामंडळाची फक्त शिवनेरीच मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरून धावताना दिसणार आहे. प्रवाशांची संख्या आणि टोलचे भाडे यात मोठी तफावत आहे. या मार्गावर जवळपास सातशे रुपये टोल भरावा लागतो.
कधीकधी बसमध्ये प्रवासी कमी आणि टोलचे भाडे जास्त अशी परिस्थिती असायची. त्यामुळे महामंडळाला लालपरीच्या फेऱ्या बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला, असे स्पष्ट करण्यात आले आहे. उलट मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर ४८५ रुपये टोलभाडे द्यावे लागते आणि या मार्गावर प्रवाशांची संख्याही जास्त असते. शिवाय मध्ये लागणाऱ्या छोट्या गावांमधील प्रवाशांची संख्याही मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे या मार्गावर टोलभाडे एसटीला भार वाटत नाही.
कारवाईचा इशारा
खरं तर साध्या एसटी एक्स्प्रेस-वेवरून न सोडता, मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरून सोडाव्या, असे निर्देश प्रशासनाने दिलेले होते. तसे झाले तर चालकाकडून दंड वसूल करण्याचाही इशारा प्रशासनाने दिला होता. बऱ्याच अंशी जुन्या मार्गावरून लालपरीचा प्रवास सुरू झाला होता. पण काही चालकांनी मनमानी केल्यामुळे कठोर निर्णय घेणे प्रशासनाला भाग पाडले.
MSRTC ST Bus Big Decision Red Bus Will Not Travel
Mumbai Pune Express Highway