मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – टेलिकॉम कंपन्या दर एक-दोन वर्षांत प्रीपेड रिचार्ज आणि मोबाईल बिलाच्या रकमेत वाढ करून ग्राहकांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात. या कंपन्या लाख ऑफर्स देतील, पण कुठल्या ना कुठल्या मार्गातून सर्वसामान्य माणसाच्या खिशाला नक्कीच कात्री लावतील. आता पुन्हा एकदा रिचार्ज बिलाच्या रकमेत वाढ होणार असल्याचे टेलिकॉम कंपन्यांनी स्पष्ट केले आहे.
टेलिकॉम कंपन्यांनी २०२१ मध्ये मोबाईल रिचार्ज आणि पोस्टपेड बिलाच्या रकमेत वाढ केली होती. आयडिया व व्होडाफोनने ४२ टक्क्यांनी वाढ केल्यानंतर सर्वच कंपन्यांनी वाढ करायला सुरुवात केली होती. यावर्षी सुद्धा अश्याचप्रकारची वाढ होणार असल्याचं कंपन्यांनी सांगितलं आहे. यावर्षी एप्रिलच्या आसपास ही वाढ होण्याची शक्यता आहे. 5G संबंधित ARPU (एव्हरेज रेव्हेन्यू पर युझर) टेरिफ नगण्य होण्याची शक्यता असल्याने 4G च्या किंमती वाढविण्यात येणार असल्याचे टेलिकॉम कंपन्यांचे म्हणणे आहे. हे केवळ प्रिपेडसाठी नसून पोस्टपेड युझर्सलाही लागू असणार आहे. दोघांनाही नेहमीपेक्षा जास्त किंमत मोजावी लागेल, असे चित्र आहे. मुख्य म्हणजे सध्या मोबाईल कंपन्या एक महिन्याच्या नावावर २४ किंवा २८ दिवसांचेच रिचार्ज देतात. त्यामुळे वाढीव किंमतीत पूर्ण एक महिनाही रिचार्जचा लाभ मिळत नसल्याने ग्राहकांचा तसाही तोटाच होत आहे. आता आणखी किंमती वाढवून ग्राहकांचे हाल करण्याची तयारी टेलिकॉम कंपन्यांनी केली आहे.
4G वर 5G चा लाभ
5G प्लान्स महागणार नसल्याचे एअरटेल आणि जीओ या टेलिकॉम कंपन्यांनी स्पष्ट केले आहे. युझर्स त्यांच्या जुन्यात रिचार्जवर 5G सेवेचा लाभ घेऊ शकणार आहेत. 5G सेवा प्रिमीयम केली जाणार नाही. पण ही सेवा सुरू करण्यासाठी सुरुवातीला एक रक्कम भरणे आवश्यक असेल, असेही कंपन्यांनी स्पष्ट केले आहे.
Mobile Prepaid and Postpaid Will Be Costly Soon
Telecom Company BSNL Reliance JIO Vodafone Airtel