इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – गुजरातच्या मोरबी जिल्ह्यात एक भीषण दुर्घटना घडली आहे. हलवाड येथे एका मिठाच्या कारखान्याची भिंत कोसळल्याने 30 मजूर ढिगाऱ्याखाली गाडले गेले. यातील 12 मजुरांचा मृत्यू झाला आहे तर 18 जण गंभीर जखमी झाले आहेत.
जखमींना शहरातील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. हलवड जीआयडीसी येथील सागर सॉल्ट नावाच्या कारखान्याची भिंत कोसळली. यावेळी 30 मजूर कारखान्यात काम करत होते. त्यांच्यासोबत काही मजुरांची मुलेही होती, या घटनेनंतर जेसीबी मशिनच्या सहाय्याने भिंत उचलून मृत व जखमींना बाहेर काढण्यात आले. ढिगाऱ्याखाली असण्याची शक्यता आहे. मात्र, कंपनीकडून अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.
भिंत कोसळल्यानंतर स्थानिकांनी बचावकार्य सुरू केले. भिंत कशामुळे कोसळली हे अद्याप समजू शकलेले नाही. मधल्या सुटीत 40 हून अधिक कामगार जेवायला गेले होते. काही कामगार भिंतीजवळ बसून मीठाचे पुडे बांधत होते. या दरम्यान संपूर्ण भिंत त्यांच्या अंगावर कोसळली. अपघातात मृत्युमुखी पडलेले मजूर हे राधानपूर तालुक्यातील गावातील रहिवासी आहेत. ही घटना सागर केम फूड इंडस्ट्रीज येथे घडली, ज्यांना GIDC हलवडमधील प्लॉट क्रमांक 61, 62 आणि 63 चे वाटप करण्यात आले आहे. कंपनी इतर उत्पादनांसह खाद्य मीठ देखील तयार करते.
कामगार आणि रोजगार मंत्री आणि स्थानिक आमदार ब्रिजेश मेरजा यांनी सांगितले की, हलवड औद्योगिक परिसरात असलेल्या समुद्री मीठ कारखान्यात ही दुःखद घटना घडली. “किमान 12 कारखान्यातील कामगारांचा मृत्यू झाला आहे,”
मदतीची घोषणा
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी मोरबी येथील मीठ कारखान्याची भिंत कोसळून मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक कामगाराच्या नातेवाईकांना सीएम रिलीफ फंडातून 4 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी मोरबीचे जिल्हाधिकारी आणि यंत्रणा चालकांना तात्काळ बचाव आणि मदत कार्य करण्याचे निर्देश दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोरबी येथील दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. पीएमओने केलेल्या ट्विटमध्ये, पंतप्रधानांनी या अपघातात प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी (PMNRF) मधून प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर जखमींना 50-50 हजार रुपये दिले जाणार आहेत.