नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– महावितरणच्या नाशिक परिमंडलातील घरगुती, औदयोगिक, वाणिज्यिक, पाणीपुरवठा, पथदिवे व ईतर वर्गवारीच्या ३ लाख ७९ हजार ग्राहंकांकडे सद्यस्थितीत जवळपास ५३० कोटी ४६ लाख रुपये थकबाकी असुन, महावितरणची आर्थिक स्थिती गंभीर असल्याने ही थकबाकी वसूली करण्यासाठी थकबाकीदार ग्राहकांचा नियमानुसार वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरु आहे. या मोहिमेमध्ये वीज बिलांच्या थकबाकीमुळे नाशिक परिमंडलात माहे मार्च २५ महिन्यात ९ हजार २११ थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला असून उर्वरित ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याचे काम सुरू आहे. सदर ग्राहकांना पुन्हा वीज पुरवठा सुरळीत करून घ्यायचा असेल तर त्यांना नियमानुसार एकूण थकबाकीसह पुनर्रजोडणी शुल्क भरावे लागणार आहे. त्यामुळे गैरसोय आणि कटू प्रसंग टाळण्यासाठी थकबाकीदार ग्राहकांनी वीज देयकांचा भरणा वेळेत करून सहकार्य करावे असे आवाहन महावितरणच्या नाशिक परिमंडलाच्या वतीने करण्यात आले आहे.
नाशिक मंडळाअंतर्गत घरगुती वर्गवारीतील एकूण १ लाख १२ हजार ग्राहकांकडे १० कोटी ८० लाख, वाणिज्यिक वर्गवारीतील १३ हजार १३७ ग्राहंकांकडे ३ कोटी २८ लाख रुपये, औद्योगिक वर्गवारीतील ६६३ ग्राहकांकडे ६१ लाख रुपये, पथदिवे वर्गवारीतील २ हजार ६७९ ग्राहकांकडे ७८ कोटी ६० लाख, पाणीपुरवठा योजनेतील १ हजार ४ ग्राहकांकडे २० कोटी १९ लाख तसेच मालेगाव मंडळाअंतर्गत घरगुती वर्गवारीतील एकूण ३८ हजार १०३ ग्राहकांकडे २ कोटी ८४ लाख, वाणिज्यिक वर्गवारीतील २ हजार ६९० ग्राहंकांकडे ५४ लाख रुपये, औद्योगिक वर्गवारीतील ३०१ ग्राहकांकडे ५९ लाख रुपये, पथदिवे वर्गवारीतील १ हजार ४५७ ग्राहकांकडे ५२ कोटी ४६ लाख, पाणीपुरवठा योजना ८६५ ग्राहकांकडे २३ कोटी ६८ लाख तर अहमदनगर मंडळात वरील सर्व वर्गवारीतील २ लाख १ हजार ९६१ ग्राहकांकडे ३३२ कोटी ६९ लाख रुपये थकबाकी आहे अशी एकूण नाशिक परीमंडलात एकूण ३ लाख ७९ हजार १३० ग्राहकांकडे ५३० कोटी ४६ लाख रुपये थकबाकी आहे.
दरमहा सातत्याने पाठपुरावा करून ग्राहकांना नित्यनेमाने संपर्क करून सुद्धा वीजबिलांची थकबाकी महावितरणसाठी चिंतेचा विषय आहे. ग्राहकांना वेळेत वीज बिल भरता यावे तसेच ग्राहकांच्या वीज वापराबाबत व बिलाबाबत पारदर्शकता यावी यासाठी ग्राहका़नी नोंदणी केलेल्या मोबाईलवर मीटर रिडी़ग, वीज बिलाचे व इतर आनुषंगिक संदेश दिले जातात, पण तरीही पूर्ण महिना विजेचा वापर केल्यानंतर मिळालेले देयक भरण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने महावितरणची पथके तयार करण्यात आली असून थकबाकीदार ग्राहकांविरोधात नाईलाजास्तव कठोर पाऊले घेत वसूली मोहीम तीव्र करण्यात आली आहे. यासोबतच थकबाकीदार ग्राहकांनी वेळेत देयकांचा भरणा न केल्यास विद्युत पुरवठा खंडित करण्यापूर्वी विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर वा ईमेलवर वीज पुरवठा खंडित करण्याबाबतची नोटीस पाठविली जात आहे. या नोटीसचा विहित कालावधी संपताच ग्राहकाचा वीज पुरवठा खंडित केल्या जाणार आहे. वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर सदर ग्राहकाने वीज देयकाच्या थकबाकीची रक्कम व ग्राहक वर्गवारीनुसार पुनर्रजोडणी शुल्क (जीएसटीसह) भरल्यानंतर भौगोलिक भागानुसार ग्राहकांचा वीज पुरवठा पुर्ववत जोडणी करण्यास लागू शकतो. त्यामुळे गैरसोय आणि कटू प्रसंग टाळण्यासाठी ग्राहकांनी महावितरणच्या वीज देयकाचा भरणा वेळेत करून सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.