मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात अनेक वर्ष शिवसेना-भाजप युतीची परंपरा होती, परंतु सुमारे अडीच वर्षांपूर्वी विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या त्यानंतर राज्यात शिवसेना-भाजप यांच्यामध्ये मुख्यमंत्री पदावरून सत्ता संघर्ष पेटला होता. त्यातच युती तुटून शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत एकत्र येत महाविकास आघाडीची स्थापना केली. परंतु ही आघाडी या आघाडीमध्ये अडीच वर्षानंतर बिघाडी होऊन खुद्द शिवसेना पक्षांमध्येच उभी फूट पडली आणि महाविकास आघाडीच्या सरकारला सत्तेवरून पाय उतार व्हावे लागले.
त्यानंतर शिवसेना मधील बंडखोर तथा फुटीर गटाचे नेते एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. त्यासोबतच भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारून पुन्हा एकदा शिवसेनेचा बंडखोर गट आणि भाजप यांची युती झाली, तर दुसरीकडे महाविकास आघाडी मधील घटक पक्ष विरोधी बाकावर बसू लागले. परंतु त्यांच्यामध्ये देखील समन्वयाचा अभाव दिसून येतो. इतकेच नव्हे तर किरकोळ कारणावरून देखील धुसफूस दिसत आहे. आता पुन्हा एकदा महाविकास आघाडी फुटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावरून महाविकास आघाडीत तणाव निर्माण झाला आहे. विरोधी पक्षनेतेपद आम्हाला मिळावे, असा दावा काँग्रेसने केला होता. मात्र उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षनेतेपदी शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांची शिफारस केली. त्यानंतर उपसभापती निलम गोऱ्हे यांनी दानवेंच्या नियुक्तीची घोषणा केली. त्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजीचं वातावरण आहे.
याबाबत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, महाविकास आघाडी ही नैसर्गिक आघाडी नाही. जनतेनं आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिला होता. परंतु २०१९ च्या निकालानंतर लोकशाहीचा तमाशा भाजपाने केला. विपरीत परिस्थितीत आम्ही महाविकास आघाडीत जाण्याचा निर्णय घेतला होता. जनतेच्या हितासाठी पक्षाध्यक्ष सोनिया गांधींनी तो निर्णय घेतला होता. विरोधी पक्षात काम करण्याची आमची मानसिकता होती असं त्यांनी सांगितले.
महाविकास आघाडीत नाराजी नाट्य सुरू आहे. त्यांच्यातील नाराजीचा मुद्दा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद हा आहे.विधान परिषदेतील सभागृह नेतेपद शिवसेनेला देण्याचा निर्णय झाल्याने काँग्रेसमध्ये नाराजी आहे. यावर काँग्रेस आमदार अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते माध्यमांशी बोलत होते. अशोक चव्हाण म्हणाले, “काँग्रेस पक्षाला विधान परिषदेत सभागृह नेतेपदाचं, विरोधी पक्षनेतेपदाचं स्थान मिळालयला हवं होतं. मात्र, चर्चा न होताच परस्पर हा निर्णय झाला आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे काँग्रेसमध्ये याची प्रतिक्रिया आहे.
तर दुसरीकडे महाविकास आघाडी ही कायमची आघाडी नाही. स्थानिक कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर काँग्रेस स्वबळावर लढायला तयार आहे. एकीकडे दोस्ती करायची आणि पाठीवर वार करायची ही भूमिका काँग्रेसची नाही. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद देताना काँग्रेसला विश्वासात घेतले नाही. महाविकास आघाडी म्हणून यावर चर्चा व्हायला हवी होती. चर्चा न करता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेता निवडला गेला त्याला आमचा विरोध आहे अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाष्य केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत काँग्रेस राहणार की बाहेर पडणार याबाबत विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. विरोधी पक्षनेतेपदी अंबादास दानवेंची निवड विधान परिषदेत शिवसेनेचे संख्याबळ जास्त असून विरोधी पक्षनेतेपदी मराठवाड्यातील शिवसेना आमदार अंबादास दानवे यांची निवड करावी अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने उपसभापतींकडे केली.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मान्यतेचे शिफारस पत्रही उपसभापती निलम गोऱ्हे यांना देण्यात आले. त्यानंतर उपसभापती कार्यालयाकडून विरोधी पक्षनेतेपदी अंबादास दानवे यांची निवड केल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र याच निवडीवरून आता महाविकास आघाडीत नाराजीनाट्य रंगलं आहे. त्यात नाना पटोलेंनी महाविकास आघाडीत कायमची नाही असे सांगत महाविकास आघाडीत फूट पडण्याचेच संकेत दिले आहेत.
Maharashtra Politics Mahaalliance Break up