इंडिया दर्पण विशेष लेखमाला
– पॅव्हेलिअन –
महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे
महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा निकाल लागला आहे. शिवराज राक्षेने हा किताब पटकावला. ही स्पर्धा आणि शिवराजचे यश याविषयी सांगत आहेत ज्येष्ठ क्रीडा समीक्षक जगदीश देवरे….
मूळचा पुण्याच्या राजगुरूनगरचा परंतु नांदेडच्या आखाड्यातून खेळणारा शिवराज राक्षे या पहिलवानाने अवघ्या ५५ सेकंदात सोलापूरच्या महेंद्र गायवाडला चितपट करून यंदा ६५ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा मानाचा “महाराष्ट्र केसरी” किताब पटकावला आहे. विशेष म्हणजे अंतिम लढतीतील हे दोघे पहिलवान एकाच गुरूचे म्हणजे वस्ताद काका पवारांचे शिष्य असल्याने या लढतीविषयीची उत्कंठा वाढलेली होती. दोघेही काका पवार आणि गोविंद पवार यांच्या आंबेगाव, कात्रज येथील काका पवार तालमीत कुस्तीचे धडे घेतात. परंतु, १२ वर्षांच्या प्रदीर्घ तपश्चर्येची फलीतं शिवराजला मिळाली आणि महेंद्रचा दुहेरी पट काढून तो विजेता ठरला. या लढतीनंतर दोघांच्या गुरूंनी मात्र, त्याचे लक्ष्य ऑलिम्पिक पदकावर असल्याचे सांगून, एक प्रकारे या दोघांनी इथेच थांबू नये असाच मोलाचा सल्ला लढतीनंतर दिला. आता जणु काही या दोघांमधली चढाओढ भविष्यातही कायम रहावी अशीच इच्छा व्यक्त केली आहे.
शिवराजच्या खांद्याला दुखापत झाल्याने गतवर्षी महाराष्ट्र केसरीमधून माघार घ्यावी लागली होती. मात्र, यंदा महाराष्ट्र केसरी होण्याचे स्वप्न त्याने पुर्ण केले आणि मानाची चांदीची गदा, ५ लाख रुपये आणि त्याचबरोबर महिंद्र थार ही एसयुव्ही पटकावली. उपविजेत्या महेंद्र गायकवाडला ट्रॅक्टर आणि २.५ लाख रूपयांचे बक्षिस देण्यात आले. याखेरीज, वजनी गटात विजेत्या ठरलेल्या १८ मल्लांना दुचाकी देण्यात आल्या. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ४५ तालमींमधून तयार झालेले सुमारे ९०० मल्लांनी या स्पर्धेत आपले कसब आजमावले.
शिवराज आणि महेंद्र हे दोघेही महाराष्ट्रातील सर्वसामान्य शेतकरी कुटूंबातील आहेत. शिवराजने स्वप्न साकार केले. त्याच्यावर गावच्या लोकांचे आणि तालुक्याचे प्रेम आहे. त्याचे कष्ट त्याला उपयोगी पडले अशा काहीशा साध्या सरळ शब्दात त्याच्या वडिलांनी या विजयाचे कौतुक केले. त्यांचा शेती आणि दुधाचा व्यवसाय आहे. शिवराज गेल्या काही वर्षांपासून केसरी किताबाचा संभाव्य मानकरी समजला जात होता. परंतु, काही ना काही दुखापतीमुळे त्याला हे यश मिळत नव्हते. दुसरीकडे, “मला विठ्ठल पावला” अशा शब्दात उपविजेता ठरलेल्या महेंद्र गायकवाडच्या आई-वडिलांनी प्रतिक्रीया दिली आहे. महेंद्रची आई सुरेखा गायकवाड या २५०० लोकसंख्या असलेल्या मंगळवेढा तालुक्यातील शिरसी गावाच्या सरपंच आहेत.
स्पर्धेचा इतिहास
कुस्तीचा गजर १९६१ सालापासून “महाराष्ट्र केसरी” स्पर्धेच्या रूपाने महाराष्ट्रात अव्याहतपणे सूरू आहे. अपवाद फक्त कोरोनाचा. पुर्वी ही स्पर्धा महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेतर्फे घेतली जात होती. परंतु १९८३ साली झालेल्या २८ व्या कुस्तीगिर परिषदेत या स्पर्धेला या खेळासाठी सर्वस्व वाहिलेला प्रायोजक मिळाला आणि तेव्हापासून या स्पर्धेचा चेहरा मोहराच बदलला आहे. कुस्ती महर्षी कै.मामासाहेब मोहोळ यांच्या स्मरणार्थ मोहोळ कुटूंबियांतर्फे या स्पर्धेसाठी लागणारी गदा आणि बक्षिसे दिली जातात. या स्पर्धेच्या विजेत्यांना दिल्या जाणा-या ज्या चांदींच्या गदा असतात त्याचेही एक वेगळे वैशिष्ट्य आहे.
विजेत्यांना सर्वसाधारणपणे १० ते १२ किलो चांदीची गदा दिली जाते. या गदेत आतल्या बाजुला सागवानी लाकडाचा उपयोग करण्यात आलेला असतो व त्यावर २८ गेजच्या चांदीच्या पत्र्यावर सुंदर असे नक्षीकाम केले जाते. एका बाजूला श्री हनुमानाचे व दुस-या बाजूला कुस्तीमहर्षी स्व.मामासाहेब मोहोळ यांच्या प्रतिमा असतात. विशेष म्हणजे, पेशव्यांच्या दरबारात भांड्यांवर नक्षीकाम करणारे आणि मानपत्र तयार करणारे पुण्यातील पानघंटी कुटूंबाकडून या गदा तयार करून घेतल्या जातात. महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून या स्पर्धेसाठी येणा-या कुस्तीगिरांमध्ये या स्पर्धेचे एक अनन्यसाधारण आणि ऐतिहासीक असे महत्व आहे.
Maharashtra Kesri Wrestling Tournament by Jagdish Deore