मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील कोरोना निर्बंधांमध्ये शिथीलता देण्यासंदर्भात आज निर्णय होण्याची दाट चिन्हे आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक थोड्याच वेळात होत आहे. या बैठकीत यासंदर्भात सविस्तर चर्चा केली जाणार आहे. त्यात प्रामुख्याने शाळा सुरू करणे आणि ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव नाही तेथे निर्बंध हटविणे यावर निर्णय घेतला जाणार आहे.
कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन या अवताराने राज्यात शिरकाव केला. त्यानंतर पाहता पाहता संसर्ग झपाट्याने वाढत गेला. त्यामुळेच राज्य सरकारने राज्यात कोरोना कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यात शाळा बंद पासून ते खासगी कार्यालयांमध्ये ५० टक्के उपस्थितीच्या निर्बंधाचाही समावेश आहे. मात्र, राज्यातील एकूण कोरोना संसर्गाची सद्यस्थिती पाहता आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत त्यावर गांभिर्याने चर्चा केली जाणार आहे. सद्यस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव हा महानगरांमध्ये आणि काही गावांमध्येच दिसून येत आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागात संसर्गाचे प्रमाण अत्यल्प आहे. अशा स्थितीत ज्याठिकाणी प्रादुर्भाव आहे तेथेच निर्बंध कायम ठेवून अन्य ठिकाणी निर्बंधांमध्ये शिथीलता देण्याबाबत आजच्या बैठकीतच निर्णय होण्याची चिन्हे आहेत.
राज्यभरातील शाळा पुन्हा सुरू करण्यासंदर्भातील प्रस्ताव शिक्षण विभागाने तयार केला आहे. त्यात येत्या सोमवारपासून शाळा सुरू करण्याचा विचार आहे. यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होणार आहे.