पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यभरातील विद्यार्थी, शाळा आणि पालक या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचे वृत्त आहे. राज्यभरातील तब्बल २५ लाख ३० हजार विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अवैध ठरल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या सर्व प्रकाराला नेमके कारणीभूत कोण आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
आधार कार्ड ही देशभरातील भारतीय नागरिकांसाठी जणू काही ओळखता ओळखपत्र बनले आहे, त्यामुळे आधार कार्डचा अनेक शासकीय आणि खासगी कामकाजासाठी महत्त्वाचे कागदपत्र म्हणून उपयोग होतो. नागरिकांना विविध शासकीय लाभ घेण्यासाठी आधार कार्डचा उपयोग होतो त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना देखील शैक्षणिक कामकाजासाठी आधार कार्डचा उपयोग होतो.
परंतु गेल्या काही वर्षांमध्ये बोगस आधार कार्डचा सुळसुळाट झाला आहे. विशेषतः महाराष्ट्र राज्यात बोगस तथा बदनावर आधार कार्डचे प्रमाण वाढले असून अनेक आधार कार्ड अवैध ठरले आहेत, त्यात विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याचे दिसून येते. सध्या राज्यातील सर्व प्रकारच्या माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती तत्काळ उपलब्ध व्हावी आणि सरकारच्या विविध योजनांचा लाभ विद्यार्थ्यांना मिळवा, यासाठी शिक्षण विभागाने शाळा आणि मुख्याध्यापकांना सर्व विद्यार्थ्यांचे आधार अपडेट करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
राज्यात पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे तब्बल २५ लाखांपेक्षा जास्त आधार कार्डमध्ये त्रुटी असल्याचे दिसून आले आहे. यामध्ये सर्वाधिक २ लाख ५८ हजार ४०७ आधारकार्ड पुणे जिल्ह्यात; तर सर्वांत कमी १५१७ सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळले. हे सर्व आधारकार्ड ३१ ऑगस्टपूर्वी अपडेट करण्याचे आदेश शिक्षण आयुक्तांनी राज्यातील सर्व विभागाने दिले. आधारकार्ड अपडेट असेल तर त्यावर संचमान्यता करण्यात येईल, असे आदेश मागील वर्षी होते. परंतु, यातील प्रमुख अडचणी आणि समस्या दूर न होता पुन्हा यंदाच्या शैक्षणिक वर्षात आधारकार्ड अपडेट कामाचे काम सुरू करण्यात आले आहे. १ ऑगस्ट २०२२ रोजी शिक्षण विभागाने जारी केलेल्या पत्रानुसार राज्यात एकूण २ कोटी २१ लाख ३१ हजार ४७२ विद्यार्थ्यांची नोंद पोर्टलवर आहे. त्यापैकी १ कोटी ८८ लाख ५ हजार ९९७ विद्यार्थ्यांची आधार नोंदणी आहे.
राज्यातील ३३ लाख २५ हजार ४७५ विद्यार्थ्यांची विनाअधार नोंदणी आहे. १ कोटी १० लाख ५८ हजार ५६५ विद्यार्थ्यांची आधार पडताळणी सुरू आहे. त्यात ८५ लाख ९० हजार ५६ विद्यार्थ्यांचे आधार वैध असल्याचे आढळले आहे. तर २४ लाख ६८ हजार ५०९ विद्यार्थ्यांच्या आधारमध्ये त्रुटी आहेत. त्यात आधार केंद्रावर सुरुवातीला माहिती भरताना नावात मराठी व इंग्रजी भाषा आद्याक्षर बदल, जन्म तारखेचे केवळ वर्ष, आडनाव, आईवडिलांचे नाव व मूळ टीसीवरील नावे भिन्न असल्याचे आढळले आहे.
विशेष म्हणजे मागील वर्षीपासून आधार अपडेटचे काम सुरू असून अद्याप ते पूर्ण झाले नसल्याने येत्या ३१ डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याच्या सूचना शिक्षण आयुक्तांनी दिल्या आहेत. मात्र शिक्षक, मुख्याध्यापकांनाही आधार अपडेट करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने तेसुद्धा हैराण झाले आहेत. तसेच प्रशासनाने आधार अपडेट करण्याच्या सूचना शिक्षक, मुख्याध्यापकांना दिल्या असल्या तरी हे काम करताना येणाऱ्या अडचणींनी शिक्षक त्रास्त झाले आहेत.
स्टुडंट पोर्टलला आधार माहिती अपडेट करताना त्यातील काही टॅब लॉक असल्याने नाव, जन्मतारीख अपडेट होत नाही. विद्यार्थ्यांनी आधार काढलेल्या मूळ सेंटरवरून नावामध्ये चुका झाल्याने त्या अपडेट करूनही बदलत नाहीत, अशा तक्रारी आहेत. आधार अपडेट करून वैध केल्यावरही मिसमॅचच्या संख्येतून ते वगळता येत नाहीत, अशा तक्रारीही आहेत.
शालेय शिक्षण विभागांतर्गत विद्यार्थ्यांसाठी लाभाच्या विविध उपाययोजना राबविल्या जातात. या योजना पात्र विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शिक्षण संचालनालयाने आधार क्रमांक अपडेट करण्याबाबत गतवर्षीच कळविले आहे. मात्र, आधार कार्ड अपडेट करण्यास राज्यातील अनेक जिल्ह्यांकडून कुचराई होत असल्याचे सातत्याने दिसले आहे. प्रशासनाकडून सूचना देऊनही पहिली ते बारावीच्या सुमारे २५ लाख विद्यार्थ्यांचे आधार अपडेट नसल्याने या योजनांच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
आता डिसेंबर २०२२ अखेर विद्यार्थ्यांचे आधार कार्ड नोंदणी करण्याबाबत शिक्षण विभागाने आदेश दिले आहेत. शाळा स्तरावर याबाबत पूर्तता करण्यासाठी शिक्षकांकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र, काही बाबी शाळेच्या मर्यादेपलीकडे आहेत. याशिवाय संच मान्यता, शालेय पोषण आहार या आवश्यक बाबी आधार नोंदणीची निगडित असल्याने अनुदानित आणि शासकीय शाळा काळजीपूर्वक काम करत आहेत, पण या तुलनेत अन्य शाळांचे काम खूपच कमी आहे.
शालेय शिक्षण विभागांतर्गत विद्यार्थ्यांसाठी लाभाच्या विविध उपाययोजना राबविल्या जातात. त्या पात्र विद्यार्थ्यांपर्यंत पोचविण्यासाठी शिक्षण संचालनालयाने आधार क्रमांक अपडेट करण्याबाबत कळविले आहे. सर्व विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक सरल प्रणालीत ऑनलाइन पद्धतीने अपडेट करण्याच्या सूचना शिक्षण आयुक्तांनी दिल्या आहेत.
Maharashtra 25 Lakh Students Aadhar Card Technical Issue
School Parents Updation UIDAI Student Portal Information