इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – प्रख्यात टीव्ही मालिका महाभारतामध्ये श्रीकृष्णाची भूमिका साकारणारे नितीश भारद्वाज आता त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. नितीश यांनी त्यांची पत्नी व आयएएस अधिकारी स्मिता गाते यांच्याशी घटस्फोट घेतला आहे. तब्बल १४ वर्षांनी त्यांचा हा संसार संपुष्टात आला आहे.
नितीश आणि स्मिता यांनी २००५ मध्ये विवाह केला होता. या दोघांनाही जुळ्या मुली आहेत. स्मिता आणि त्यांच्या दोन्ही कन्या या इंदूरमध्ये राहतात. नितीश यांनी घचस्फोटाबाबत सांगितले आहे की, मुंबईतील एका कौटुंबिक न्यायालयात २०१९ मध्ये मी घटस्फोटासाठी अर्ज केला होता. आम्ही का विभक्त झालो याबाबत मी फारशी चर्चा करणार नाही. कारण, अद्यापही न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मी फक्त एवढेच सांगेन की, घटस्फोट हा मृत्यूपेक्षा वेदनादायी आहे. कारण, आपण तुटलेल्या हृदयासोबत राहत असतात, असे नितीश यांनी म्हटले आहे.
नितीश आणि स्मिता यांचा हा दुसरा विवाह होता. सर्वसाधारणपणे पहिला विवाह असफल होतो आणि दोघे विभक्त होतात. मात्र, दुसरा विवाह सुद्धा न टिकणे हे चांगले नाही. कधी कधी समजून न घेणे किंवा त्याग न करणे यामुळे वाद-मतभेद होतात. परिणामी, विभक्त होण्याशिवाय पर्याय राहत नाही, असे नितीश यांनी म्हटले आहे.