मानवी मनाची स्पंदन टिपणारी कवयित्री
कवयित्री वर्षा किडे/कुलकर्णी या नागपूर येथे बँकेत सेवेत असून त्यांना साहित्य निर्मितीची ओढ आहेत.विशेष म्हणजे त्या एम.कॉमला विद्यापीठातून मेरीटमध्ये पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण आहेत.त्याचबरोबर त्या अर्थशास्त्र विषयात एम.ए ,बीएड आहेत. ग्रंथालय शास्त्रपदविका परीक्षेत त्या विद्यापीठातून प्रथम क्रमांक मिळवून मेरीटमध्ये आल्या आहेत.त्याचबरोबर इंग्रजी टंकलेखन,शिवणकला डिप्लोमा परीक्षेत त्या जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या आहेत.आजपर्यंत त्यांची ‘गुंतता हृदय हे’, ‘झिरो मॅरेज ’ ‘ट्रोलधाड ’ हे कथासंग्रह, ‘चेरीचंझाड’, ‘काळीजफूल’ हे ललित लेखसंग्रह, ‘वेध अंतरंगाचा’ चिंतनात्मक लेखसंग्रह, ‘कुंजधून’ काव्यसंग्रह , ‘विचारांच्या तळाशी ’ वैचारिक लेखसंग्रह,प्रकाशित आहेत.
त्यांच्या तरुण भारत, दै.सकाळ, दै.महाराष्ट्र टाइम्स, दै.पुण्यनगरी, दै.लोकशाही वार्ता, दै.लोकसत्ता, दै.महासागर, दै.लोकमत,दै.देशोन्नती (नागपूर) दै.संचार(सोलापूर ),दै. पुढारी (कोल्हापूर) इ.वृत्तपत्रातून कथा,कविता,ललित , स्फुट,विनोदी चिंतनपर लेख, पुस्तक परीक्षणं, मुलाखती प्रकाशित आहेत. दै.तरुण भारत व दै. संचार, साप्ताहिकमध्ये स्तंभलेखन करीत असतात.त्यांचे सामाजिक,शैक्षणिक ,राजकीय,सांस्कृतिक, आध्यात्मिक , विनोदी,पर्यावरण व स्त्री समस्यांवर पाचशेच्यावर लेख प्रसिध्द झालेले आहेत.आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावर कथा,कविता,ललित श्रुतिका,नभोनाट्य भाषणे,मुलाखती,चर्चा,झुंबर,फोन इन कार्यक्रम प्रसारित झाले आहेत.वनिता विश्व या महिला विषयीचा कार्यक्रम ‘हे बंध रेडिओचे ’, ‘स्त्रीशक्तीचा जागर ’, ‘सुसंवाद तुझा माझा ‘ आदी कार्यक्रमातून त्यांच्या मुलाखती, गप्पागोष्टी,विविध विषयावर चर्चा ,परिसंवाद प्रसारित झालेले आहेत.नागपूर दूरदर्शन केंद्र, साम टी.व्हीवरून त्यांचे कार्यक्रम प्रक्षेपित झालेले आहेत.
त्या सातत्याने विविध मासिकं,त्रैमासिकं,वार्षिकांक,दिवाळीअंक, ई-दिवाळीअंक, डिजिटल दिवाळीअंक,ऑनलाईन वृत्तपत्रातून लेखन करत असतात. अ.भारतीय मराठी साहित्य संमेलनं , विविध साहित्य संमेलनातून सहभाग असतो. नागपुरातील विदर्भ साहित्यसंघ ,पद्मगंधाप्रतिष्ठान,वैदर्भिय लेखिका संस्था,अभिव्यक्ती, साहित्यविहार,रसिकराज, साहित्य कलासेवा मंडळ, अजीवन शिक्षक साहित्य संघ, अभिजात मराठी शिक्षक साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य या साहित्यिक संस्थां,ग्रंथालय भारती, ,सुरसप्तक व स्वरसाधना आदी संस्थांशी त्या जोडलेल्या आहेत. कवयित्री वर्षा किडे/कुलकर्णी त्यांना पद्मगंधा प्रतिष्ठानचा सर्वोत्कृष्ट राज्यस्तरीय कथासंग्रह साहित्य पुरस्कार,पद्मगंधा नाट्यलेखन राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार (झाले मोकळे आकाश २०१६ ) पद्मगंधा व साहित्य विहार मराठी साहित्य संमेलन राज्यस्तरीय पुरस्कार,अभिव्यक्ती राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार, रसिकराज राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार, वैचारिक साहित्याचा राज्यस्तरीय पुरस्कार (वेध अंतरंगाचा २०१६)कविवर्य कुसुमाग्रज स्मृती ‘युवा साहित्य पुरस्कार २०१८,नवी दिल्ली येथील राष्ट्रीय महिला शक्ती पुरस्कार,महाराष्ट्र गौरव साहित्यरत्न पुरस्कार सावित्री गौरव राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत .त्यांच्या ‘झिरो मॅरेज कथासंग्रहासं’ २०१८ सालचा बेळगाव येथील ‘वि ना मिसाळ ‘कथासंग्रह पुरस्कार , सूर्योदय समावेशक मंडळ जळगाव कथा पुरस्कार ,मुर्तीजापुरचा सृजन प्रतिभा पुरस्कार ,अंकुर साहित्य संघ,अकोला- अंकुर साहित्य पुरस्कार, पालघरचा अक्षर साधना पुरस्कार मिळाले, आहेत.त्यांना लेखन,वाचन,गायन,वादन,बागकाम, फोटोग्राफी,रांगोळी, पेंटिंग,चित्रपट ,गाणी,कलात्मक वस्तूंचा संग्रह करण्याची आवड आहेत.
कवयित्री वर्षा किडे/कुलकर्णी यांची कविता स्त्री मनाची स्पंदनं टिपताना दिसते.स्त्री मनाच्या जाणीव त्यांच्या कवितेत ठळकपणे जाणवतात.मानवी जीवनातील भावना , सण,उत्सव त्यांच्या कवितेत येतात. राधा-कृष्ण यांच्या प्रेमाची अनेक मिथकं त्यांच्या कवितेत डोकावत राहतात.श्रावण,पाऊस,चांदणं, हिरवाई,मोरपीस,वसंत,कोकीळ यांचा वावर त्यांच्या कवितेत दिसतो.तद्वतच रातराणी, मोगरा, शेवंती, बकुळ, सोनसावरी ,गुलमोहर, कुंदा,सोनचाफा,केवडा यासारख्या फुलझाडांचा समावेश त्यांच्या कवितेत दिसतो.राधा,कृष्ण, मीरा, मोरपीस, बासरी अनेकदा डोळ्यात भरते.त्यांच्या कवितेतील नायिका विरहाने व्याकुळ झालेल्या दिसतात.त्या अधिक सोशिक दिसतात. त्या लीन व संयमशील वाटतात.त्यांच्या कवितेत स्त्री मनाची होणारी घुसमट सतत जाणवत राहते.त्यांच्या कविता स्वच्या पातळीवर दीर्घकाळ रेंगाळताना दिसतात. त्यांची कविता म्हणजे त्यांचं त्यांच्याशी चालेलं हितगुज वाटते.त्या स्वत:शी संवादात ज्यास्त रमताना दिसतात. स्व हा तान्ह्या कवितेचा मध्यवर्ती घटक आहे. स्वला कवेत घेऊन त्यांच्या कवितेची वाटचाल होतांना दिसते.त्यांच्या कवितेत प्रेम आहे.त्यामुळे प्रियकर-प्रेयशी येते. त्यांच्या मनोवृत्तीचे दर्शन अनेकदा होताना दिसते.त्यांच्या वृत्ती-प्रवृत्तीचे दर्शन वाचकांना झाल्याशिवाय राहत नाही. प्रेम आले म्हणजे पाठोपाठ प्रेमाचा विरह येतो. कुटुंबातील अनेक नाती त्यांच्या कवितेत मधूनमधून डोकावत राहतात.विशेष म्हणजे आई-बाबा हे त्यांचे श्रद्धास्थान आहेत. त्यामुळे असे होत असेल. त्यांच्य कविता त्यांच्या बालपणाला कवेत उचलून घेताना दिसतात. बालपणाच्या अनेक आठवणींची साठवण त्यांच्या कवितेने केलेली दिसते. विशेषत: शालेय बालपण अनेकदा येऊन जातं. त्यांच्या कवितेत निसर्गाची अनेकविध रूपं येतात. दरी,डोंगर,पशू,पक्षी,झाडे,पाने,फुले यांनी त्यांची कविता भरलेली वाटते. खरं म्हणजे त्यांच्या कविता आज आपण त्यांच्याच आवाजात ऐकू या.
प्रा.लक्ष्मण महाडिक
९४२२७५७५२३