जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील एका दीड वर्षीय मुलाचा गँगरीनमुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या प्रकरणी डॉक्टरांनी दाखविलेल्या हलगर्जीपणामुळे बालकाचा जीव गेल्याचा आरोप लावण्यात आला आहे. जनतेचा संताप लक्षात घेत संबंधित डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाघळुद येथील दुर्वेश पाथरवट हा पाथरी येथे आईसोबत मामाच्या गावी राहत होता. १० ऑक्टोबर २०२१ रोजी दुर्वेशला ताप आल्याने कुटुंबीयांनी त्यास पाथरी गावातीलच डॉ. स्वप्निल पाटील यांच्या दवाखान्यात नेले होते. त्यांनी तपासून दुर्वेश यास कमरेवर एक इंजेक्शन व काही गोळ्या लिहून दिल्या. तीन दिवसांनी पुन्हा ताप आल्याने कुटुंबीयांनी त्याला पुन्हा दवाखान्यात नेले. याठिकाणी डॉ. स्वप्निल पाटील नव्हते, तर डॉ. युवराज पाटील यांनी दुर्वेश यांच्या दोन्ही कमरेवर इंजेक्शन देऊन गोळ्या लिहून दिल्या होत्या.
दरम्यान, १४ ऑक्टोबरला दुर्वेशच्या कमरेवर इंजेक्शन दिल्याच्या ठिकाणी त्रास व्हायला लागल्याने कुटुंबीयांनी डॉ. युवराज पाटील यांना संपर्क साधला. पण, संपर्क झाला नाही म्हणून त्यांनी गावातीलच डॉ. सुभाष जाधव यांच्याकडे त्याला नेले. त्यांनी सुध्दा दुर्वेशला कमरेवर व हाताच्या दंडावर इंजेक्शन दिले व पुन्हा काही गोळ्या लिहून दिल्या होत्या. मात्र कोणताही फरक न होता उलट त्रास वाढतच असल्याने उपचाराला जळगावात पाठविले आणि बालकाला गँगरीन झाल्याचे समोर आले होते.
दीड वर्षानंतर गुन्ह्याची नोंद
सुरुवातीला या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. दरम्यान दुर्वेशचे सॅम्पल तपासणीसाठी नाशिक येथील न्याय वैद्यकीय प्रयोग शाळा येथे तर अकस्मात मृत्यूचे चौकशीचे पत्र हे अभिप्रायासाठी वैद्यकीय अधीक्षकांकडे सुध्दा पाठविण्यात आले होते. त्यांच्याकडील अभिप्राय अहवालात डॉ.स्वप्निल युवराज पाटील, युवराज गंगाराम ऊर्फ जयराम पाटील व डॉ सुभाष जाधव यांना इंजेक्शन देण्याची परवानगी नाही. तरी त्यांनी इंजेक्शन दिले. त्यांनी दिलेल्या इंजेक्शनच्या ठिकाणी गँगरीन होऊन मृत्यू आलेला आहे, असे नमूद आहे. त्यामुळे या प्रकरणी दीड वर्षानंतर डॉक्टरांविरूध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
Jalgaon Crime Small Baby Death Injections Doctor Fir