मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शांततेचा पुरस्कार करणारे जैन समाजबांधव सध्या दिल्लीपासून गल्लीपर्यंत रस्त्यावर उतरले आहेत. हे बघून सारेच बुचकाळ्यात पडले आहेत. पण या भूमिकेसाठी एक कारणही आहे. आणि ते गुजरात व झारखंडमधील मंदिरांशी संबंधित आहे. जैन समाज बांधवांनी याप्रकरणी राष्ट्रपतींना निवेदन दिले आहे. तसेच, त्या त्या शहरातील जिल्हाधिकाऱ्यांकडेही गाऱ्हाणे मांडले जात आहे. हा वाद आणि संघर्ष नेमका काय आहे हे आपण आता सविस्तर जाणून घेऊ…
झारखंडमधील जैन समाजाचे मंदिर श्री सम्मेद शिखर आणि गुजरातमधील पलिताना मंदिराच्या विशिष्ट्य वादावरून ही अस्वस्थता पसरली आहे. झारखंडमधील मंदिराला राज्य सरकारने पर्यटनस्थळ म्हणून घोषित केले. मुळात त्याच निर्णयाला जैन समाजाचा विरोध होता. पण त्यात भर म्हणून या ठिकाणी एका दारुड्याचा फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाला. जैन धर्माच्या पवित्र मंदिराच्या ठिकाणी अशाप्रकारचे कृत्य होत असल्यावरून प्रचंड संताप व्यक्त होऊ लागला. आज दारू ढोसली जात आहे, उद्या आणखी वाईट कृत्ये होतील, अशी भीती समाजाने व्यक्त केली आहे. २०१९ मध्ये केंद्र सरकारने या परिसराला पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील घोषित केले होते. तेथपर्यंत कुणाचीही नाराजी नव्हती. मात्र पूर्णपणे पर्यटनक्षेत्राचा दर्जा दिल्यावर मुद्दा चिघळला.
गुजरातेत मंदिराची तोडफोड
गुजरातमधील जैन धर्माच्या पवित्र पलिताना मंदिराची तोडफोड झाल्यामुळे समाजबांधवांना रस्त्यावर उतरण्यास भाग पाडले. मंदिराची तोडफोड आणि परिसरातील उत्खनन तातडीने थांबवावे, अशी मागणी जैन धर्माने केली आहे. दरम्यान मुंबई व दिल्लीत निघालेल्या मोर्च्यात जैन बांधव पांढऱ्या शुभ्र वस्त्रात दिसत आहेत. त्यामुळे रस्त्यांवर वेगळेच चित्र निर्माण झाले आहे.
अवैध मद्यविक्री
गुजरातमधील पलिताना मंदिराच्या परिसरात अवैध मद्यविक्री सुरू असल्याची बाब उघडकीस आली आहे. जैन धर्मियांनी याचा कडाडून निषेध केला आहे. सरकारने तातडीने कारवाई करून हा प्रकार थांबवावा, अशी मागणी केली आहे. उत्खनन आणि मंदिर परिसरातील तोडफोड यामुळे नाराज झालेल्या जैन बांधवांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. आता सरकारने कारवाई केली नाही, तर आमरण उपोषणाचा इशाराही आंदोलनकर्त्या जैन बांधवांनी दिला आहे.
Jain Community Agitation Why Reasons Delhi to Mumbai