मनीष कुलकर्णी, इंडिया दर्पण वृत्तसेवा
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात गुरुवारी झालेल्या ५९ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्जला पराभूत केले आहे. या सामन्यानंतर दोन्ही संघांचे आव्हान आयपीएलमधून संपुष्टात आले आहे. सर्वाधिक वेळा विजेतेपद पटकावणारा मुंबई इंडियन्स संघ आणि सर्वाधिक वेळा स्पर्धेचे विजेतेपद मिळवणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या चेन्नई सुपरकिंग्ज या दोन्ही दिग्गज संघांचे आव्हान संपल्याने त्यांचे चाहते निराश झाले आहेत.
मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून चेन्नई सुपरकिंग्जला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पहिली फलंदाजी करताना चेन्नईचा संघ १६ षटकांत सर्व गड्यांच्या मोबदल्यात फक्त ९७ धावा करू शकला. प्रत्युत्तर देताना मुंबईने १४.५ षटकांत पाच गड्यांच्या मोबदल्यात १०५ धावा करून सामना जिंकला. आयपीएलचा हा हंगाम आता अखेरच्या टप्प्यात आला आहे. दहा संघांपैकी मुंबई आणि चेन्नईचे संघ प्ले ऑफच्या बाहेर पडले आहेत. तर गुजरात टायटन्स हा संघ यापूर्वीच प्ले ऑफसाठी पात्र ठरला आहे. आता उर्वरित सात संघांमध्ये प्ले ऑफची चुरस पाहायला मिळणार आहे.
मुंबईने विजय मिळवल्यामुळे चेन्नईच्या प्ले ऑफच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. परंतु गुणतालिकेत कोणताही बदल झालेला नाही. चेन्नईचा संघ ८ गुणांसह नवव्या आणि मुंबई ६ गुणांसह दहाव्या स्थानावर कायम आहे. गुजरात टायटन्स १८ गुणांसह पहिल्या स्थानावर, लखनऊ सुपर जायन्ट्स १६ गुण मिळवून दुसऱ्या स्थानावर, राजस्थान रॉयल्स १४ गुणांसह तिसऱ्या स्थानावर, रॉयल चॅलेंजर्स बँगलोर १४ गुण मिळवून चौथ्या स्थानावर, दिल्ली कॅपिटल्स १२ गुणांसह पाचव्या स्थानावर, सनरायजर्स हैदराबाद १० गुणांसह सहाव्या स्थानावर, कोलकाता नाईट रायडर्स १० गुणांसह सातव्या स्थानावर, पंजाब किंग्ज १० गुण मिळवून आठव्या स्थानावर राहिला आहे.
मुंबई आणि चेन्नई या दिग्गज संघांची स्पर्धेतून झालेली एक्झिट चाहत्यांना चटका लावणारी आहे. परंतु तरीही गुजरात आणि लखनऊ या नव्या संघांची उंचावलेली कामगिरी निश्चितच आश्वासक मानली जात आहे. आता सात संघांमध्ये प्ले ऑफमध्ये येण्यासाठी चुरस राहणार आहे. सर्व संघांसाठी आता करो अथवा मरो अशीच परिस्थिती असणार आहे.