पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आर्थिक मंदीचं नाव निघाल्यावर अंगावर काटा यावा, अशी स्थिती आहे. कारण कोरोनाने जगाचे जे हाल केले ते यापूर्वी महायुद्धांमध्ये देखील झाले नव्हते. आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आणखी एकदा मंदी येण्याची शक्यता वर्तवली आहे. तसे झाले तर बेरोजगारीचं मोठं संकट भारतावर ओढवलं जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
पुणे येथे जी-२० परिषदेच्या उद्घाटनाला नारायण राणे उपस्थित होते. त्यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. राणे म्हणाले, ‘जूननंतर भारतात मंदी येण्याची शक्यता आहे. पण केंद्र सरकार मंदीच्या परिणामांशी लढण्याकरिता सज्ज आहे. भारतावर या मंदीचा परिणाम होणार नाही.’ मुख्य म्हणजे अलीकडेच आयटी क्षेत्रातील अल्पकालीन मंदीमुळे अमेरिकेसह अनेक देशांमध्ये नोकऱ्यांवर परिणाम झाले. अमेझॉनसह अनेक मोठ्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरी पाठवलं. अश्यात राणे यांनी बेरोजगारीबद्दल मोठं विधान केलं आहे. उद्योग वाढवले तर रोजगार वाढतील, रोजगार वाढला तर जीडीपी वाढेल. आपल्याला भारतात नफा कमावून देणाऱ्या तंत्रज्ञानाची गरज आहे, असं राणे म्हणाले. तरीही भारताची मंदीला सामोरे जाण्याची पूर्ण तयारी आहे. भारतात मंदी आलीच तर जूननंतर येईल, असेही ते म्हणाले.
म्हणून उद्योग बाहेर जात नाहीत
महाराष्ट्रात सरकार बदलल्यामुळे येथील उद्योग गुजरातमध्ये गेले असा आरोप सातत्याने होत आहेत. पण त्यात काहीही तथ्य नसल्याचे राणे म्हणाले. सरकार बदलले म्हणून उद्योग बाहेर जात नाहीत, असं राणे म्हणाले.
महाराष्ट्रात जमीन महाग
ज्या राज्यांमध्ये रास्त दरात जमीन मिळते, कर कमी भरावा लागतो त्या राज्यांमध्ये उद्योगांची गुंतवणुक जास्त होते. महाराष्ट्रात जमीनी महाग आहेत, पायाभूत सुविधांचे दर जास्त आहेत, त्यामुळे परिणाम होतो. महाराष्ट्र विकसित राज्य असल्यामुळेही परिणाम होतो, असं राणे यांनी स्पष्ट केलं.
ते कमळ भाजपचे नाही
जी-२०च्या बोधचिन्हातील कमळ भाजपचे असल्याचा आरोप विरोधकांकडून होतो. पण ते चिन्ह भाजपचे किंवा भारताचे नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जी-२० चे अध्यक्ष आहेत, असे राणे यांनी सांगितले.
India Will Face Recession Minister Narayan Rane Says
G20 Summit Pune