नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बँकेप्रमाणेच पोस्ट ऑफिसमध्ये म्हणजेच टपाल कार्यालयामध्ये गुंतवणूक करणे ही एक सुरक्षित योजना मानली जाते. त्यामुळे सुरक्षित आणि चांगल्या परताव्यासाठी पोस्ट ऑफिस बचत योजनांना जास्त प्राधान्य दिले जाते. पोस्ट ऑफिस योजनांमध्ये गुंतवलेले संपूर्ण पैसे 100 टक्के सुरक्षित असण्याची हमी आहे. आपण गुंतवणुकीवर मजबूत परतावा शोधत असाल तर पोस्ट ऑफिसच्या अशा स्कीमबद्दल जाणून घेतल्यास पैसे गुंतवून मोठा फंड तयार करू शकता.
दरमहा 1500 रुपये जमा करा : पोस्ट ऑफिसच्या ‘ग्राम सुरक्षा योजने’बद्दल. ही पोस्ट सुरक्षा योजना कमी जोखमीच्या गुंतवणुकीचे उदाहरण असून उत्तम परतावा देऊ शकते. या योजनेत दरमहा 1500 रुपये जमा करावे लागतील. म्हणजेच 50 रुपये प्रतिदिन जमा करावे, ही रक्कम नियमितपणे जमा केल्यास तुम्हाला भविष्यात 31 ते 35 लाख रुपयांचा फायदा होईल.
गुंतवणुकीचे नियम
> 19 ते 55 वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक या योजनेत खाते उघडू शकतो.
> या योजनेची किमान विमा रक्कम 10 हजार ते 10 लाख रुपयांपर्यंत आहे.
> या योजनेचे प्रीमियम मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक भरले जाऊ शकतात.
> या योजनेत तुम्ही कर्जही घेऊ शकता.
> या योजनेत सहभागी होऊन तीन वर्षानंतरही तुम्ही निवड रद्द करू शकता. मात्र, या स्थितीत कोणताही लाभ मिळणार नाही.
35 लाखांचा फायदा
समजा एखाद्या व्यक्तीने वयाच्या 19 व्या वर्षी या योजनेत गुंतवणूक केली आणि 10 लाख रुपयांची पॉलिसी घेतली, तर त्याचा मासिक प्रीमियम 55 वर्षांसाठी 1515 रुपये, 58 वर्षांसाठी 1463 रुपये आणि 60 वर्षांसाठी 1411 रुपये असेल. या प्रकरणात, पॉलिसी खरेदीदाराला 55 वर्षांसाठी 31.60 लाख रुपये, 58 वर्षांसाठी 33.40 लाख रुपये आणि 60 वर्षांसाठी 34.60 लाख रुपये मॅच्युरिटी लाभ मिळेल.