नवी दिल्ली / पुंछ (जम्मू-काश्मिर) – भारतीय सैन्याकडून अनेक वेळा पराभवाची नामुष्की पत्करूनही पाकिस्तानची खुमखुमी काही कमी होताना दिसत नाही. त्यामुळे पाताळयंत्री आणि कपटी पाककडून पुन्हा कारवाया सुरू असल्याचे दिसून येत आहे. पुंछ जिल्ह्याच्या सीमेवर मोठ्या संख्येने शस्त्रे आणि अतिरिक्त सैन्य पाक सरकार तैनात करत आहे. त्यामुळे तेथील गावे रिकामी केली जात आहेत.
भारतीय लष्करातील एका अधिकाऱ्याच्या हवाल्यानुसार असे सांगण्यात येत आहे की, पाकिस्तानी सैनिकांच्या कधी उघड तर कधी गुप्त कृतीचा हेतू स्पष्ट दिसून येत आहे. देशाची सीमा ओलांडून पाकिस्तानी सैनिकांची ही कारवाई पाहून भारतीय सीमेच्या सुरक्षेत तैनात असलेल्या आपल्या सैनिकांनीही आपली गस्त वाढविली आहे. नियंत्रण रेषेत सुरक्षा दलात तैनात असलेल्या जवानांना रात्रंदिवस जागरुक राहून शत्रूच्या प्रत्येक भयंकर कृत्याला कडक प्रतिसाद देण्याची सूचना अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
पुंछ जिल्ह्यातील खादी, करमाडे आणि देववार सेक्टरच्या सीमा ओलांडून पाकिस्तानी भागातील सैनिक ही टोली – पीरमध्ये अनेक दिवसांपासून पाकिस्तानी बाजूने संशयास्पद हालचाली करताना दिसून येत आहे. तसेच पाक नियंत्रण रेषेवरील सैन्याची जमवाजमव आणि आधुनिक शस्त्रे जमा करीत आहे. या कामात हेलिकॉप्टर आणि बुलेटप्रूफ वाहने वापरली जात आहेत. त्याचवेळी टोली – पीर परिसरातील गावातून गावकऱ्यांना जबरदस्तीने बाहेर काढण्यात येत आहे. या ग्रामस्थांना बाहेर पाठविण्यात आले आहे.
पाकिस्तानी सैनिकांसह चिनी सैन्यदेखील तैनात केले गेले असून ते मोठे षडयंत्र रचण्याच्या प्रक्रियेत आहे. सीमेवर वाढती हालचाल पाहून भारतीय सैन्य दलाच्या जवानांनीही पूर्वीपेक्षा दक्षता वाढविली आहे. यावर्षी २५ फेब्रुवारी रोजी भारत-पाकिस्तान दरम्यान वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली होती, ज्यामध्ये युद्धबंदी कराराच्या अंमलबजावणीवर सहमती दर्शविली गेली होती. त्यानंतर नियंत्रण रेषेवर शांतता असताना आंतरराष्ट्रीय सीमेवर दोन वेळा गोळीबार करण्यात आला. आता पाकिस्तानच्या संशयास्पद कृतींमुळे नियंत्रण रेषेवरून पुन्हा तणाव वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.