नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जुनी पेन्शन योजना लागू करा, कंत्राटी कामगारांना कायम करा, रिक्त पदे भरा यासह विविध मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी १४ मार्चपासून बेमुदत संप करणार आहेत. या संपाचे निवेदन आज जिल्हाधिकारी यांना या कर्मचा-यांनी दिले. यावेळी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष दिनेश वाघ, सरचिटणीस सुनंदा जरांडे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थितीत होते.
या संपामध्ये जुनी पेन्शन योजना लागू करा ही प्रमुख मागणी असल्याचे अध्यक्ष वाघ यांनी सांगितले. देशातील ५ राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू केली आहे. महाराष्ट्रातही ही योजना सुरू करावी, इतर राज्यांनी घेतलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्रातही हा निर्णय घेतला पाहिजे. राज्यात जुनी पेन्शन योजनाच कर्मचाऱ्यांचा शाश्वत आधार आहे. त्यामुळे जुन्या पेन्शनसाठी लढा उभारण्यासाठी हा संप आहे. याचबरोबरच अनेक प्रलंबित मागण्या आहे. त्याही शासनाने मान्य कराव्या. यासाठी निवेदन व मागणी पत्रक दिेले आहे.
हे निवेदन देतांना संजय जाधव, लता परदेशी, तुषार नागरे, दुर्गेश कुलकर्णी, जीवन आहेर, राजेंद्र फाबळे, जिजा गवळी, भास्कर भामरे, आनंद पाटील, अर्चना देवरे, प्रशांत खालकर, उमाकांते ढोले, रामचंद्र तडवी, संभाजी आगलावे, अरुण तांबे, सागर नागरे, तेजस पगार, सिटु संलग्न आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संघटना विभागीय अध्यक्ष ए. के.वाबळे, एस. एम. पिंगळे, कंत्राटी कामगार अध्यक्ष सचिन बनकर हे उपस्थित होते.