रांची (झारखंड) – संपूर्ण जग आज संसारिक मोह-माया आणि ग्लॅमरच्या झगमगाटामागे धावत असताना काही युवक भौतिक सुख सोडून संन्यास घेत आहेत. हे विचित्र वाटत असले तरी सत्य आहे. वेगवेगळ्या भागातील पाच युवकांनी भौतिक सुखाचा त्याग करून संन्यास घेतला आहे. या पाचही युवकांनी दिगंबर जैन संन्यासी बनण्याचा निर्णय घेतला असून, ते सध्या या प्रक्रियेतून जात आहेत.
यामध्ये मध्यप्रदेशमधील पन्ना जिल्ह्यातील ब्रजपूर येथील रहिवासी आणि हिरे व्यावसायिक ब्रजेश (२६), दिल्ली येथील रहिवासी आणि आयआयटी झालेला अविरल (२७), इंदूरमधील रहिवासी आणि सरकारी अधिकारीपुत्र स्वातम (१९), भोपाळ येथील मोठ्या शेतकरी कुटुंबातील संजय (३६), आणि भिंड येथील रहिवासी विद्यार्थी अंकुश (२५) यांचा समावेश आहे.
पाचही युवकांना रविवारी जगातील सर्वात मोठे जैन तीर्थस्थळ असलेल्या श्री सम्मेद शिखरजी मधुबन येथे आयोजित जैनेश्वरी मुनी दीक्षा समारंभात जैन मुनींची दीक्षा देण्यात आली. ही दीक्षा त्यांना प्रसिद्ध गुरू जैन संत आचार्य विशुद्ध सागरजी महाराज यांनी दिली. विशुद्ध सागरजी महाराज यांच्यापासून प्रभावित होऊन पाचही युवकांनी जैन मुनी बनून मोक्ष प्राप्तीचा मार्ग निवडला आहे.
यांना भेटून घेतला निर्णय
पाच युवकांपैकी एक असलेल्या अविरल याने २०१५ मध्ये आयटीआय वाराणसी येथून कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण घेतले होते. उत्तीर्ण झाल्यानंतर २०१५ मध्ये त्याने बंगळुरूमध्ये गोल्ड मेन एसएसीएचएस कंपनीत नोकरी सुरू केली. त्याला ४० लाखांचे वार्षिक पॅकेज मिळत होते. तो आनंदात जीवन जगत होता. न्यूयॉर्कसह अनेक देशात त्याची भ्रमंती झाली होती. फुटबॉल खेळणे आणि बाइक चालविणे हे त्याचे छंद होते. याचदरम्यान २०१८ मध्ये बंगळुरू येथे त्याने आचार्य विशुद्ध सागरजी महाराज यांचे दर्शन घेतले. तिथे आदित्य सागरजी महाराज यांचे चातुर्मास सुरू होता. अविरल याने सांगितले, की विशुद्ध सागरजी महाराज यांचे दर्शन घेतल्यानंतर भौतिक सुखाच्या मागे धावायचे नाही, असा निर्णय त्याने घेतला होता. या निर्णयाला घरच्यांनी आधी विरोध केला. घरीच राहून संन्याशासारखे जीवन जग. ब्रह्मचर्याचे पालन कर, असे कुटुंबीयांनी समजावण्याचा प्रयत्न केला.
हिरे व्यापारीही
मध्यप्रदेशच्या पन्ना जिल्ह्यातील ब्रजपूर येथील बालचंद्रजी जैन यांचा हिऱ्यांचा व्यवसाय आहे. १९९० पासून त्यांचे कुटुंब आचार्य विशुद्ध सागरजी महाराज यांच्या संपर्कात होते. बालचंद्रजी यांच्या हिऱ्यांच्या व्यवसायात त्यांचा मुलगा ब्रजेश हातभार लावत होता. विशुद्ध सागरजी महाराज यांच्या सानिध्यात राहण्याचा ब्रजेशवर परिणाम झाला. पैसा-आडक्याचे आकर्षण त्याला साधू बनण्यास रोखू शकले नाही. त्याने ब्रह्मचर्याचे पालन केले. लग्न केले नाही. एके दिवशी त्याने साधू बनण्याची माहिती कुटुंबीयांना दिली. त्याच्या या निर्णयाचा सर्वांनी सन्मान केला.