चेन्नई – देशातील कोणत्याही पदावरील वरिष्ठ अधिकारी व्यक्तीच्या सेवानिवृत्ती किंवा बदली नंतर त्यांना निरोप देण्यात येतो, यावेळी संबंधित अधिकाऱ्याने केलेले भाषण काही वेळा अत्यंत महत्त्वपूर्ण तसेच वादग्रस्त देखील ठरू शकते. मद्रास उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना बदली झाल्यानंतर निरोप देण्यात आला. याप्रसंगी त्यांनी केलेले भाषण असेच वादग्रस्त ठरले आहे.
मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश संजीव बॅनर्जी यांनी त्यांच्या निरोप समारंभात (फेअरवेल पार्टीत) मोठे वादग्रस्त विधान केले आहे. वास्तविक मुख्य न्यायाधीशांच्या बदलीला आधीच मोठा विरोध होत आहे. मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश संजीव बॅनर्जी यांची मेघालय उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून बदली झाली आहे. त्यामुळे त्यांना निरोप देण्यासाठी छोटेखानी समारंभ आयोजित करण्यात येणार होते. मात्र, बॅनर्जी यांची त्यासाठी इच्छा नव्हती.
न्यायमूर्ती संजीव बॅनर्जी यांनी फेअरवेल संदेश पत्र लिहिले आहे. त्यात ते म्हणतात की, ‘आपल्या कामकाजाच्या काळात, सरंजामशाहीची संस्कृती उद्ध्वस्त करू शकलो नाही, यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो. आम्ही या सुंदर आणि वैभवशाली व्यवस्थेतील सर्वांचे कायमचे ऋणी आहोत. निरोप न घेतल्याबद्दल मी वैयक्तिकरित्या दिलगीर व्यक्त करीत आहे.’ यावेळी त्यांनी रजिस्ट्रीची यंत्रणा आणि प्रक्रिया सुधारण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल सहकाऱ्यांचे कौतुक केले. तसेच न्यायव्यवस्थेत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू ठेवण्याचा सल्लाही दिला.
सरन्यायाधीश एन.व्ही. रमण यांच्या नेतृत्वाखालील सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने न्यायमूर्ती बॅनर्जी यांच्या बदलीची शिफारस केली होती. मात्र, हा निर्णय दि. ९ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आला. या निर्णयावरून बराच वाद झाला होता. या निर्णयाच्या विरोधात मद्रास उच्च न्यायालयातील वकील पुढे आले होते. तसेच मद्रास बार असोसिएशननेही या निर्णयाला विरोध करणारा ठराव मंजूर केला आहे. कारण त्याच वर्षी त्यांना मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनवण्यात आले. आणि लगेच काही दिवसांनी बदली ही करण्यात आली.