इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – लग्न झालं म्हणजे आपला एक भागिदार कमी झाला, अशी मानसिकता असलेली भावंड आजही समाजात आहेत. एवढच नाही तर लग्न झालेल्या मुलीला परकं समजणारे पालकही आज समाजात मोठ्या प्रमाणात आहेत. पण लग्न झाल्यानंतर मुलगी परकी होते आणि तिचा संपत्तीवर अधिकार राहात नाही, ही मानसिकता चुकीची असल्याचा निर्वाळा गुजरात उच्च न्यायालयाने अलीकडेच दिला.
गुजरात उच्च न्यायालयात यासदंर्भातील एका प्रकरणावर सुनावणी सुरू होती. यावेळी न्यायमूर्तींनी मुलीला परकं धन समजणाऱ्या कुटुंबाला चपराक लगावली आहे. मुलगी आणि बहीण यांच्याबद्दलची समाजाची मानसिकता बदलण्याची गरज आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. कौटुंबिक मालमत्तेच्या वाटपासंदर्भातील ही याचिका होती. न्या. अरविंद कुमार व न्या. ए. शास्त्री यांच्या खंडपिठापुढे ही सुनावणी झाली. जिल्हा व सत्र न्यायालयातील निकालाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.
याचिकाकर्त्याने बहिणीचा संपत्तीवरील अधिकार संपला आहे की नाही, याबाबत स्पष्टता नसल्याचे याचिकेत म्हटले आहे. त्यावर न्यायालयाने मुलीचं लग्न झालं म्हणून तिची कुटुंबातील जागा बदलत नाही, जिथे तिचा जन्म झाला तिच तिची जागा असते, असे स्पष्ट केले आहे. आता मुलीचा संपत्तीवर काही अधिकार नाही, ही मानसिकता चुकीची असल्याचे याचिकाकर्त्याला म्हटले आहे.
कायदा बदलला आहे
पूर्वी वडिलोपार्जित संपत्तीमध्ये घरातील पुरुषांचेच वाटे होते. यामध्ये बहिणी किंवा घरातील कोणतीही स्त्री वाटेकरी राहात नव्हती. मात्र, हिंदू उत्तराधिकारी कायद्यात २००५ मध्ये बदल करून मुलींना वडिलोपार्जित संपत्तीत वाटा देण्याची तरतूद करण्यात आली आहे. हिंदू कायद्यानुसार दोन प्रकारच्या मालमत्ता आहेत. एक वडिलोपार्जित आणि दुसरी स्व-अधिग्रहित मालमत्ता. वडिलोपार्जित संपत्ती चार पिढ्यांपर्यंत वैध असते.
मुलामुळे फरक पडत नाही
कुटुंबातील मुलाचं लग्न झालं असेल किंवा नसेल, त्याची परिस्थिती चांगली असेल किंवा वाईट असेल… त्यामुळे लग्न झालेल्या मुलीच्या परिस्थितीत बदल होत नाही. तिची जागा पहिलेपासून शेवटपर्यंत कुटुंबात सारखीच असते, असंही न्यायालय म्हणालं.
High Court on Married Daughter Property Rights